हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योजनाबद्ध कार्य करणे आवश्यक ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

व्यासपिठावर डावीकडून अधिवक्ता बन्सीलाल भाटी, ईश्वरप्रसाद खंडेलवाल आणि सौ. स्वाती मोदी

जोधपूर (राजस्थान) – हिंदु जनजागृती समिती अनेक वर्षांपासून सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करणे आणि समाजात साधनेचे महत्त्व सांगणे यांसाठी कार्यरत आहे. धर्मसंस्थापनेसाठी साधना हा मूलमंत्र आहे. साधना केल्याने आपल्यावर ईश्वराची कृपा होते आणि ईश्वराच्या कृपाशीर्वादाने सर्व शक्य होते. हिंदु संस्कृतीचे पालन केले, तरच आपल्याला यश मिळेल. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला योजनाबद्ध कार्य करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वांना संघटित प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन ‘लष्कर-ए-हिंद’ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील स्वास्थ्य साधना केंद्रामध्ये नुकतेच हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला संबोधित करतांना ते बोलत होते.

अधिवेशनाचे उद्घाटन सनातनच्या संत पू. सुशीला मोदी, रा.स्व. संघाचे प्रांत सहकार्यवाह अधिवक्ता बन्सीलाल भाटी आणि श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनाला सरदारपुरा विकास समितीचे श्री. दुर्गाप्रसाद शर्माजी, वनबंधू परिषदेचे अध्यक्ष श्री. सुरेश राठी, भारत विकास परिषदेचे श्री. भूतडा, अधिवक्ता जी.डी. गोदारा आदी मान्यवरांसह अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते.

हिंदूंचे अस्तित्व टिकवण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

आज भारताच्या ‘सेक्युलर’ राज्यघटनेत हिंदु धर्माला कोणतेही विशेष संरक्षण उपलब्ध नाही. यासमवेतच हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून देशाच्या विरोधात एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण होत आहे. ज्याचा बहिष्कार आणि जागृती यांच्या माध्यमातून विरोध होणे आवश्यक आहे. हिंदूंचे अस्तित्व टिकवण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय आहे.

गाय ही संस्कृतीचा आधार आणि समृद्धीचे मूळ ! – अधिवक्ता सूर्यप्रकाश शर्मा

गाय ही संस्कृतीचा आधार आणि समृद्धीचे मूळ आहे. गोमूत्र आणि गोमय यांमुळे वास्तूदोष नष्ट होतात. राजस्थान सरकारकडून शहरांमध्ये गोपालनासाठी बनवण्यात आलेल्या नियमांप्रमाणे गोपालन करणे कसे शक्य आहे ? त्याला कचरा समजून शहराच्या बाहेर टाकण्याची तरतूद सरकारने केलेल्या नियमांमध्ये आहे. हा संस्कृतीवर वज्राघात आहे.

अधिवेशनाला उपस्थित धर्मप्रेमी

अधिवक्ता बन्सीलाल भाटी म्हणाले, ‘‘हिंदू सक्षम आणि बलवान झाले, तरच त्यांच्यावर कुणी वरचढ होणार नाही. त्यांनी त्यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान सहन करू नये.’’

विस्थापित पाकिस्तानी हिंदूंसाठी कार्यरत असलेले डॉ. भागचंद भील म्हणाले, ‘‘स्थानिक हिदूंनी विस्थापित हिंदूंशी आदान प्रदान करणे आवश्यक आहे.’’