जेथे भोंगे बांग देतील, तेथे हनुमान चालिसा लावा ! – राज ठाकरे, मनसे

मुंबई, ३ मे (वार्ता.) – सर्व धर्मियांना ध्वनीक्षेपकांमुळे ध्वनीप्रदूषणाचा त्रास होतो. देशातल्या प्रत्येक सरकारला हे समजलेच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणे आणि वाहतूककोंडी करणे हे कोणत्या धर्मात बसते ? आमचे मुसलमान धर्मियांना एवढेच सांगणे आहे की, या सामाजिक विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केलात, तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल. देशातील बहुसंख्य हिंदु बांधवांना माझी विनंती आहे की, ४ मे या दिवशी जिथे जिथे भोंगे अजान आणि बांग देतील, तिथे भोंग्यांवर हनुमान चालिसा लावावी, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे या दिवशी ‘ट्वीट’द्वारे केले आहे.

ट्वीटवरून प्रसारित केलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘मशिदींवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा’, असे आम्ही सरकारला आधीच सांगितले होते; परंतु याविषयी सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. आम्हाला देशातील शांतता बिघडवायची नाही. आम्हाला देशात दंगली नकोत; परंतु तुम्ही धर्मासाठी हट्टीपणा करणे सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे दायित्व असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की, या देशात आणि राज्यात कायद्याचे राज्य आहे, हे त्यांनी दाखवून द्यावे. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाजपठण यांना उत्तरदायी असलेल्या लोकांना पोलिसी खाक्या दाखवावा. माझ्या बहुसंख्य हिंदु बांधवांनी भोंग्यांविरोधात काम चालू करावे. हा विषय एका दिवसात सुटणारा नाही. देशातील सर्व राज्यकर्त्यांना भोंगे बंद पाडण्यास भाग पाडावे. शेवटी एकच सांगतो, ‘प्रत्येक राज्यातील नागरिकांनी आपापल्या सत्ताधारी राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे ? हे दाखवून द्यावे.’

राज ठाकरे यांनी या ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे की,

१. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी यांना भोंग्यांच्या आवाजामुळे होणार्‍या त्रासाविषयी सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट सांगितले आहे की, रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनीक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती मिळेल; परंतु ३६५ दिवस अनुमती मिळणार नाही. ध्वनीक्षेपकासाठीची अनुमती नियमित घ्यावी लागेल.

२. ध्वनीक्षेपक किती क्षमतेने लावावा ? त्याविषयीच्या मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या आहेत. या मर्यादा मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगत आहे. लोकवस्तीत न्यूनतम १० डेसिबल आणि अधिकाधिक ४५ ते ५५ डेसिबल आवाजात ध्वनीक्षेपक लावता येतो. लक्षात घ्या, १० डेसिबल म्हणजे आपण कुजबुज करतो, तो आवाज आणि ५५ डेसिबल म्हणजे आपल्या घरातल्या मिक्सरचा आवाज !

३. प्रश्न असा आहे की, सर्व भोंगे अनधिकृत आहेत. भोंगेच कशाला, बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत अनुमती का आणि कशी देते ? अनुमती देणारच असाल, तर हिंदूंनाही देवळांवर भोंगे लावण्याची अनुमती द्यायलाच हवी.

४. हिंदूंच्या सणांना ‘शांतता क्षेत्र’, शाळा, रुग्णालये या ठिकाणी सर्व प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मर्यादा घालायच्या; परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत. भारतीय राज्यघटनेने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते ?

५. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, हिंदुहृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी ‘सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत’, असे सांगितलेले आपण ऐकणार आहात कि तुम्हाला सत्तेवर बसवणार्‍या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात ? याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेपुढे एकदाचा होऊन जाऊ दे.

६. देशात इतकी कारागृहे नाहीत की, देशातील बहुसंख्य हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल. हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे.


राज ठाकरे यांचे हिंदूंना आवाहन

१. हिंदूंनो, त्यांना हनुमान चालिसा ऐकवा. सर्व स्थानिक मंडळे आणि सजग नागरिक यांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षर्‍यांची निवेदन पत्रे नियमित पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.

२. मशिदींमध्ये बांगेला प्रारंभ झाल्यावर त्वरित पोलिसांना १०० क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरभाष करून भोंग्यांच्या त्रासाविषयी तक्रार नियमित करावी.

३. माझ्या हिंदु बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधने झुगारून एकत्र या. आता नाही, तर कधीच नाही !


आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न ! – संदीप देशपांडे, मनसे

सभेला अनुमती न देणे, जाचक अटी घालणे, असे पोलिसांनी केले आहे. यापूर्वी अशा अटी होत्या का ? राज्य सरकारचा पोलिसांवर दबाव आहे. पोलिसांनी लावलेली कलमे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत. आम्हाला घाबरवण्यासाठी हे गुन्हे नोंद केले गेले आहेत; पण महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही, आंदोलन होणारच.