(म्हणे) ‘वर्ष १९९३ मधील मुंबई बाँबस्फोटात स्थानिक मुसलमानांचा हात नव्हता !’

हिंदु अतिरेकी नसतांना ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द रूढ करणारे; मात्र धर्मांधांच्या जिहादी कारवाया उघड होऊनही त्यांवर पांघरूण घालणारे शरद पवार यांचे मुसलमानप्रेम !

जळगाव – मुंबईत वर्ष १९९३ मध्ये झालेले १२ बाँबस्फोट हिंदू रहात असलेल्या ठिकाणी झाले होते. या बाँबस्फोटांसाठी वापरलेले साहित्य कराचीत सिद्ध करण्यात आले होते, हे मला ठाऊक होते. याचा अर्थ त्यामागे बाहेरची शक्ती होती. कुणीतरी शेजारचा देश हिंदु-मुसलमान यांच्यात वाद वाढवायचे काम करत होता. मुंबईत आग लागावी, अशा प्रयत्नात होता. स्थानिक मुसलमान त्यात नव्हते. बाँबस्फोटाचे १३ वे ठिकाण महंमद अली रोड सांगितल्यामुळे जातीय दंगली करण्याची ज्यांची इच्छा होती, त्या दंगली झाल्या नाहीत, असे वक्तव्य १५ एप्रिल या दिवशी शरद पवार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यातून स्वत:चे खोटे बोलणे दंगल टाळण्यासाठी असल्याचे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले. (मुंबईतील बाँबस्फोट स्थानिक धर्मांधांच्या सहकार्याने झाल्याचे न्यायालयात सिद्ध होऊन, तसेच या प्रकरणात अनेक स्थानिक धर्मांधांना शिक्षा होऊनही ‘मुंबई बाँबस्फोटात स्थानिक मुसलमानांचा हात नव्हता’, असे सांगणे शरद पवार यांच्या मुसलमानांच्या लांगूलचालनाची परिसीमाच होय. मुसलमान भागात स्फोट झाल्याचे सांगितल्याने नव्हे, तर ‘हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे दंगल झाली नाही’, हे शरद पवार का सांगत नाहीत ? बाँबस्फोट मुसलमान भागात झाला असता, तर हिंदूंना आतंकवादी ठरवण्यात शरद पवार यांनी पुढाकार घेतला नसता का ? – संपादक)

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘मुंबई बाँबस्फोटाच्या वेळी शरद पवार यांनी १३ वा बाँबस्फोट झाल्याची चुकीची माहिती दिली होती’, असे म्हटले होते. त्यावर पवार यांनी वरील उत्तर दिले. ते पुढे म्हणाले, ‘‘हिंदु-मुसलमान दोघेही एकत्र आले. या परकीय शक्तीच्या विरुद्ध आपण उभे रहावे’, असे त्यांचे मत बनले. त्या वेळी चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला. त्यांच्याकडून मला समन्स आले. मला विचारण्यात आले की, ‘तुम्ही असे का म्हणाला ?’ त्यावर मी म्हटले, ‘ऐक्य रहावे म्हणून बोललो.’ अहवालात स्पष्ट म्हटले आहे, ‘पवार यांनी अशी भूमिका घेतली नसती, तर मुंबईत आग लागली असती. त्यामुळे त्यांचा हा निर्णय समाजाच्या हिताचा होता.’’ (मग ‘हिंदु आतंकवाद’ असा खोटा शब्द रूढ करण्यामागील समाजहिताचा विचार कोणता आहे ? हेही शरद पवार यांनी सांगावे. – संपादक)