हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदु राष्ट्र’रूपी गोवर्धन पर्वताला काठ्या लावून खारीचा वाटा उचलावा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

रत्नागिरीत हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ

अधिवेशनात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग

डावीकडून श्री. मनोज खाडये, ह.भ.प. किशोर महाराज चौगुले आणि दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु सत्यवान कदम

रत्नागिरी, ३ एप्रिल (वार्ता.) – लडाख आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित होणे असेल किंवा पंढरपूर देवस्थानची हडप केलेली भूमी परत मिळणे असेल, यामागे एका मोठ्या लढ्याची, संघर्षाची पार्श्‍वभूमी आहे. यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना स्वत:चे नाव, पद आणि पक्ष बाजूला ठेवून हिंदु म्हणून एकत्रित आले आणि लढा दिला. त्याचेच हे यश आहे. हिंदु जनजागृती समितीचे ध्येय असलेले हिंदु राष्ट्र तर येणारच आहे; पण त्यासाठी प्रत्येक हिंदूंने एकत्र येऊन खारीचा वाटा उचलणे म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’रूपी गोवर्धन पर्वताला काठ्या लावणे होय, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील अंबर सभागृहात आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. ३ एप्रिल या दिवशी झालेल्या या अधिवेशनात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

या अधिवेशनाचा प्रारंभ सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, दापोली येथील ह.भ.प. किशोर महाराज चौगुले आणि श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर पुरोहित श्री. प्रसाद सहस्रबुद्धे आणि श्री. मयुर जोशी यांनी वेदमंत्रपठण केले.