रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या मृत्युंजय यज्ञाच्या संदर्भात श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

श्री. भूषण कुलकर्णी

१. भगवान शिवाची मूर्ती भावपूर्ण आणि सजीव जाणवणे अन् ‘प्रत्यक्ष श्री गुरूंची भेट झाली’, असेही जाणवणे

‘१३.१.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात मृत्युंजय यज्ञ झाला. यज्ञ झाला त्या वेळी मी आश्रमात नव्हतो; पण त्याच दिवशी यज्ञाची पूर्णाहुती झाल्यावर मी अनुमाने ३० मिनिटांनी आश्रमात पोचलो. त्यानंतर मी यज्ञस्थळी जाऊन पूजेतील भगवान शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्या वेळी भगवान शिवाची ती मूर्ती भावपूर्ण, मोहक आणि सजीव जाणवत होती. ती मूर्ती पुष्कळ भावमय वाटत होती. या वेळी माझ्या मनात अशीही संवेदना झाली की, प्रत्यक्ष श्री गुरुच मला भेटले.

२. मुंबईहून रामनाथी आश्रमात येत असतांना प्रवासात सहसाधिकेच्या मनात ‘आश्रमात जाऊ नये आणि घरी परत जावे’, असे विचार येणे अन् ‘आश्रमात चालू असलेल्या यज्ञाचे चैतन्य सहन न झाल्याने तिला तसे वाटले असावे’, हे लक्षात येणे

मुंबईहून रामनाथी आश्रमाकडे मी आणि सहसाधिका प्रवास करत होतो. त्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे असतांना सहसाधिकेला ‘आश्रमात जाऊ नये आणि घरी परत जावे’, असे विचार येऊन ती ते बोलून दाखवत होती. त्या वेळी मला जाणवले, ‘रामनाथी आश्रमात कोणतातरी विधी चालू असावा. त्याचे चैतन्य कार्यरत असावे.’ (प्रत्यक्षात मला १३.१.२०१९ या दिवशी मृत्युंजय यज्ञ असल्याचे ठाऊक नव्हते. आश्रमात आल्यावर मला त्या यज्ञाविषयी कळले.) त्यामुळे सहसाधिकेला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीला त्रास होत असल्याने ती तसे बोलत असल्याचे मला जाणवले.’

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक