सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर साधिकेला होते असलेले विविध शारीरिक त्रास दूर होणे

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. त्वचारोगाचा त्रास होत असतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर एका आठवड्यात त्रास दूर होऊ लागणे आणि जखम पूर्ण बरी होणे

‘१८.१०.२०२० या दिवसापासून मला त्वचारोगाचा त्रास होत होता. मी अनेक प्रकारची औषधे घेत होते, तरीही त्रास अल्पाधिक होतच होता. मला या त्रासामुळे उठता किंवा बसता येत नव्हते; कारण ते अवघड जागी दुखणे होते. तेथे जखमही झाली होती. काही ठिकाणी तिच्यातून रक्त, पाणी आणि पू बाहेर येत होता. मला जगणे नकोसे झाले होते. मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना त्रासाविषयी सांगितल्यावर त्यांनी मला ‘श्री गणेशाय नमः । श्री गणेशाय नमः । श्री गणेशाय नमः । श्री गणेशाय नम: । श्री गुरुदेव दत्त । श्री गणेशाय नम: । श्री गणेशाय नम: ।
श्री गणेशाय नमः । श्री हनुमते नम: । श्री हनुमते नमः ।’ असा नामजप करायला सांगितला. हा नामजप केल्यानंतर एका आठवड्यात माझे त्रास दूर होऊ लागले आणि जखम पूर्ण बरी झाली.

२. विविध शारीरिक त्रास होत असतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर एका मासात त्रास उणावणे

काही दिवसांपासून मला अकस्मात् पोटाचा आकार वाढणे, अंगाला सूज येणे, थकवा येणे आणि धाप लागणे, असे त्रास चालू झाल्यामुळे मला चालता येत नव्हते. आसंदीत बसता येत नव्हते आणि झोपताही येत नव्हते. माझी स्थिती पुष्कळ वाईट झाली होती. त्या वेळी सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला ‘ॐ’ चा नामजप केल्यावर माझे सर्व त्रास एक मासात हळूहळू न्यून झाले, तसेच मला जाणवणारा थकवाही उणावला.

सौ. वैशाली मुद्गल

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘आपले महान गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) सर्वांना त्रासांतून लवकर बरे करणार आहेत’, असे सांगून आश्वस्त करणे

मी सद्गुरु काकांना नामजपामुळे झालेल्या लाभाविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘वाईट शक्ती साधकांना त्रास देण्याचा अनेक प्रकारे जोरदारपणे प्रयत्न करत आहेत; पण आपले गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) महान आहेत. ते या त्रासांतून सर्वांना लवकर बरे करणार आहेत.’’ तेव्हा ‘सद्गुरु काकांचा संकल्प झाला आहे’, असे मला जाणवले.’

–  सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१.२०२१)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.