‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात सांगली जिल्ह्यातील जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती

सांगली जिल्ह्यात सनातन संस्थेच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ साधना सत्संग घेतले जात आहेत. ‘या सत्संगांच्या माध्यमातून जोडलेल्या जिज्ञासूंना साधनेची पुढील दिशा मिळावी’, यासाठी १९.१२.२०२० या दिवशी एका ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १२५ जिज्ञासू सहभागी झाले होते. सत्संग सोहळ्यात जिज्ञासूंनी सांगितलेल्या काही अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. अश्विनी जरंडीकर, विश्रामबाग, सांगली.

प्रतिवर्षापेक्षा सनातन पंचांगांचे अधिक वितरण होणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वकाही करवून घेत आहेत’, असे वाटणे : ‘मला एका साधिकेने सनातनच्या पंचांगांच्या वितरणासाठी संपर्क केला होता. मी त्यांना ‘मला १२ पंचांग वितरणासाठी द्या’, असे सांगितले. मी त्यांच्याकडे सनातन पंचांग घेण्यासाठी गेल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘मी प्रतिवर्षी ५ – ६ सनातन पंचांग वितरण करत होते. या वर्षी एवढे सनातन पंचांग आपल्याकडून वितरित होतील का ?’ काकूंनी मला १२ सनातन पंचांग दिले. मी दुसर्‍या दिवशी कार्यालयात सनातन पंचांग घेऊन गेले. मी कार्यालयातील माझ्या सहकार्‍यांना सनातन पंचांगाचे महत्त्व सांगितले आणि आगामी आपत्काळाविषयी माहिती दिली. माझ्याकडून कार्यालयातच ९ सनातन पंचांगांचे वितरण झाले. नंतर शेष ३ सनातन पंचांगांचेही वितरण होऊन मी काकूंकडून आणखी ५ पंचांग मागवून घेतले. त्या वेळी मला जाणवले, ‘मी काहीच करत नाही. परात्पर गुरु डॉक्टरच माझ्याकडून सर्वकाही करवून घेत आहेत.’ त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

सौ. राजश्री बगाडे, सांगली

नामजप आणि परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर यजमानांच्या ‘सोनोग्राफी’चे अहवाल चांगले येणे : ‘माझ्या यजमानांच्या मूत्रपिंडाचे (किडनीचे) शस्त्रकर्म झाले आहे. आम्ही एकदा तपासणीसाठी रुग्णालयात गेलो होतो. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करत होते आणि माझा नामजपही चालू होता. माझ्या यजमानांची ‘सोनोग्राफी’ केली. यजमानांच्या ‘सोनोग्राफी’ चाचणीचा अहवाल येण्यापूर्वी मला भीती वाटत होती. यजमानांच्या चाचणीचे अहवाल चांगले आले.’

कु. गीता जगदेव बिराजदार, हनुमान नगर, विश्रामबाग, सांगली.

गुरुदेवांना प्रार्थना करून सनातन पंचांगांच्या वितरणासाठी गेल्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळून सर्व पंचांगांचे वितरण होणे आणि सेवेतून आनंद मिळणे : मी वितरणासाठी ६ सनातन पंचांग घेतले होते. मी समाजातील व्यक्तींना सनातन पंचांगाचे महत्त्व सांगून वितरण करण्याचा प्रयत्न केल्यावर प्रथम नकारात्मक प्रतिसाद मिळाला. माझ्याकडून कुणीही सनातन पंचांग घेत नव्हते. मी याविषयी उत्तरदायी साधिकेला सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘देवाला मनापासून प्रार्थना करा.’’ नंतर मी ‘हे गुरुदेवा, मला समोरच्या व्यक्तीला आवश्यक असे बोलता येऊ दे. तुम्हीच माझ्याकडून ही सेवा करवून घ्या’, अशी प्रार्थना करून सनातन पंचांग वितरण करण्यासाठी गेले. तेव्हा सर्व पंचांगांचे वितरण झाले आणि मला आनंद झाला. त्यासाठी परात्पर गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

ऑनलाईन’ संत्संग सोहळ्याविषयी आलेली अनुभूती

मला इतरांशी बोलायला भीती वाटते. उत्तरदायी साधिकेने मला सगळ्यांना सत्संगाला जोडण्यासाठी संपर्क करण्याची सेवा दिल्यानंतर माझी भीती न्यून झाली.

सौ. अनुराधा राणे, सांगली

पितृपक्षात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू केल्यावर श्री नृसिंहसरस्वतींच्या पादुकांच्या दर्शनाची ओढ लागणे : ‘पितृपक्षात नेहमीप्रमाणे माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू होता. त्या वेळी मला आनंद वाटत होता. माझी दत्त महाराजांशी जवळीक निर्माण झाल्यासारखे वाटत होते. नंतर मला नरसोबाच्या वाडीला जाण्याचे वेध लागले. मला श्री नृसिंहसरस्वती महाराज यांच्या पादुका सतत डोळ्यांसमोर दिसत होत्या. ‘कधी एकदा नृसिंहवाडीला जाऊन दर्शन घेते’, अशी मला आस लागली होती.’

सौ. श्रीदेवी प्याटी, सांगली

सामूहिक नामजप करायला आरंभ केल्यावर अनेक संकटांवर मार्ग सापडणे आणि वडील रुग्णाईत असतांना त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नामजपाचे सामर्थ्य मिळणे : ‘आम्ही गणेशोत्सवापासून सामूहिक नामजप करायला आरंभ केला. आम्ही नामजप चालू केल्यापासून घरातील वातावरण प्रसन्न वाटत आहे. त्यामुळे मलाही चांगले वाटत आहे. आमच्यावर आलेल्या अनेक संकटांवर मार्ग सापडत आहे. एकदा माझे वडील पुष्कळ रुग्णाईत होते. त्या वेळी आम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नामजपाचे सामर्थ्य मिळाले.’ (२०.१२.२०२०)  (क्रमश:)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही.

– संपादक