गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित अशी प्रगती केली नाही; कारण निवडलेला मार्ग योग्य नव्हता ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नवी देहली – गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित अशी प्रगती केलेली नाही; कारण आपण प्रगतीचा जो मार्ग निवडला, तो योग्य नव्हता, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात केले.

सरसंघचालक पुढे म्हणाले की,

१.  भारतातील लोकांनी या भूमीला प्राचीन काळापासून ‘मातृभूमी’ मानले आहे. आपण हीच भूमिका जर कायम ठेवली आणि भाऊ-बहिणी म्हणून एकत्र काम केले, तर भारताची प्रगती कुणीच रोखू शकत नाही.

२. केवळ निवडणुकीतील तिकिटासाठी समाजसेवा ही सेवा नाही. नि:स्वार्थीपणे सेवा करणे, हीच खरी सेवा आहे. त्यामुळे केवळ राजकीय हेतूने सेवा करू नयेे.

३.  लोकांनी केवळ ‘जय श्रीराम’च म्हणू नये, तर प्रभु श्रीरामासारखे बनण्याचा प्रयत्नही केला पाहिजे.

आपल्याला कुणाचे धर्मांतर करायचे नाही, तर लोकांना ‘कसे जगायचे ?’ हे शिकवायचे आहे !

या कार्यक्रमाच्या एक दिवसापूर्वी झालेल्या अन्य एका कार्यक्रमात सरसंघचालक म्हणाले होते की, आपल्याला कुणाचे धर्मांतर करायचे नाही, तर लोकांना ‘कसे जगायचे ?’ हे शिकवायचे आहे. आपण भारतभूमीत जन्मलो आहोत आणि ‘आमचा पंथ कुणाचीही उपासनापद्धत न पालटता चांगला माणूस घडवू शकतो’, अशी शिकवण आपल्याला संपूर्ण जगाला द्यायची आहे. भारताला विश्‍वगुरू बनवायचे असेल, तर सर्वांना समवेत घेऊन समन्वयाने पुढे जाण्याची आवश्यकता आहे.