‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेमुळे निराशेतून बाहेर पडू शकतो’, हे लक्षात आल्यामुळे आशेची ज्योत प्रज्वलित होऊन बाह्यमनाला उत्साह वाटणे

श्रीकृष्णाच्या कृपेने पूर्वी एकदा परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला होता. त्या वेळी त्यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन पुढे दिले आहे.

श्री. विपीन देशपांडे

मी : ‘माझ्यात दोन भाग जाणवतात. एक भाग वरवरचा असून तो उत्साही आणि आनंदी वाटतो. दुसरा भाग आतमध्ये असून तो जड आणि निरुत्साही वाटतो. हे काय आहे, ते कळत नाही. उत्साह आतून जाणवण्यासाठी काय करावे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : वरचा भाग म्हणजे बाह्यमन आणि आतला भाग म्हणजे अंतर्मन किंवा चित्त. चित्तावर जसे संस्कार असतात, तसे आपल्याला जाणवते. चित्तावर स्वभावदोष आणि अहं यांचे संस्कार आहेत. त्यामुळे ‘इतर साधनेत प्रगती करून पुढे गेले; माझी प्रगती झाली नाही’, या विचाराने निराशा येते. आता ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेमुळे आपण यातून बाहेर पडू शकतो’, हे लक्षात आल्यामुळे आशेची ज्योत प्रज्वलित झाली आहे. त्यामुळे बाह्यमनात उत्साह वाटतो. बर्‍याच साधकांची निराशा बाह्यमनावर व्यापलेली असते; म्हणून त्यांच्या हे लक्षात येत नाही. तुम्हाला हे कळले आणि ही अनुभूती आली, हे अधिक महत्त्वाचे आहे.’

– श्री. विपीन देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०१५)