१४.९.२०१९ या दिवशी भृगु महर्षींच्या सांगण्यावरून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे केलेल्या पितृपूजनाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने पितृपूजनाविषयीचे लिखाण…

सनातनच्या रामनाथी (फोंडा, गोवा) येथील आश्रमात १४.९.२०१९ या दिवशी श्रीविष्णुपूजन आणि देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे केलेले पितृपूजन करण्यात आले. २३.९.२०२१ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात श्रीविष्णूचे पूजन केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे आपण वाचली. आज ऋषिपितरांचे पूजन केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/513198.html

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

२. ऋषिपितरांचे पूजन केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे

२ अ. पूजनामागील उद्देश : सध्या घनघोर सूक्ष्म युद्ध चालू आहे. या युद्धात सप्त उच्च लोकांतील चांगली शक्ती सप्तपाताळांतील वाईट शक्तींशी युद्ध करत आहेत.

सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती केवळ पृथ्वीवरील साधकांनाच नव्हे, तर दिवंगत झालेले साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांना त्रास देत आहेत. त्यामुळे ‘दिवंगत झालेले साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांना श्रीविष्णूचे कृपाशीर्वाद लाभून त्यांचे वाईट शक्तींपासून रक्षण व्हावे’, यासाठी भृगु महर्षींनी श्रीविष्णुपूजन आणि देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे पितृपूजन करण्यास सांगितले.

कु. मधुरा भोसले

२ आ. महर्षींनी दिवंगत साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांना ऋषिपितर संबोधण्यामागील कारण : ‘ऋषि’ हे दीर्घकालीन साधनेचे प्रतीक आहेत. साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु हे ऋषींप्रमाणेच ईश्वरप्राप्ती करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर आणि मृत्यूनंतरही अविरतपणे साधना करतात. त्यामुळे त्यांना ऋषिपद प्राप्त झाले आहे. त्यामुळे महर्षींनी दिवंगत साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांचा उल्लेख ‘ऋषिपितर’, असा केलेला आहे.

२ इ. सप्तर्षी आणि अरुंधती यांचे आवाहन करण्यापूर्वीच त्यांचे पूजनस्थळी शुभागमन होऊन त्यांनी साधकांना आशीर्वाद देणे : सनातनचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी ऋषींचे मंगलाष्टक पठण केले, तेव्हा उपस्थित साधकांची भावजागृती होऊन पूजास्थळी पांढर्‍या रंगाचे सात गोळे आणि पिवळसर रंगाचा एक गोळा दिसला. सात पांढरे गोळे हे सप्तर्षी असून पिवळसर रंगाचा गोळा वसिष्ठऋषींची पत्नी अरूंधती होती. त्यांनी साधकांना आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असणार्‍या ज्ञानप्राप्तीचा आशीर्वाद दिला. (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील निस्सीम समष्टी भावामुळे सप्तर्षींचे आवाहन करण्यापूर्वीच ते पूजनाच्या ठिकाणी आल्याचे जाणवले.)

२ ई. पितरांचे आवाहन केल्यावर पूजास्थळी पितृलहरी कार्यरत होणे : पितरांचे आवाहन केलेल्या कलशावरील नारळात सूक्ष्मातून हालचाल झाल्याचे जाणवले आणि पूजास्थळी पाण्याच्या लाटांप्रमाणे काही पितृलहरी कार्यरत झाल्या, तर काही धुराच्या रूपाने कार्यरत झाल्या. श्राद्धातील पितरांपेक्षा वरिष्ठ स्तराचे आणि सात्त्विक स्वरूपाच्या पितरांचे पूजास्थळी आगमन झाल्याचे जाणवले.

२ उ. वाईट शक्तींनी अडथळा निर्माण करणे : दिवंगत साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांना पूजास्थळी सूक्ष्मातून येता येऊ नये, यासाठी ६ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी सूक्ष्म उच्च लोकांना पृथ्वीशी जोडणार्‍या सूक्ष्मातील मार्गामध्ये काट्यांप्रमाणे त्रासदायक शक्ती पसरून अडथळा निर्माण केला होता. त्याचप्रमाणे वाईट शक्तींनी पितरलोकातील त्रासदायक पितरांनाही पूजास्थळी पाठवले होते. त्यामुळे पूजास्थळी दाब जाणवत होता.

२ ऊ. शापित पितरांना गती मिळणे : विधीमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी वाईट शक्तींनी साधकांच्या शापित पितरांना ऋषिपितरांचे पूजन करणार्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमण करण्यासाठी पाठवले. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ऋषिपितरांसाठी ठेवलेल्या कलशाचे पूजन करतांना त्यांच्या डोक्यावर दोन काळे नाग सूक्ष्मातून पडणार होते. इतक्यात एका ऋषींनी या नागांना हवेत झेलले आणि बाजूला केले. ऋषींचा स्पर्श झाल्यामुळे आणि लक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाल्यामुळे या शापित पितरांना सद्गती मिळाली अन् त्यांचे रूपांतर मनुष्यरूपात होऊन ते अदृश्य झाले.

२ ऐ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी स्वत:भोवती प्रदक्षिणा घातल्यावर त्यांच्या ठिकाणी कामधेनूचे दर्शन होणे : जेव्हा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी स्वत:भोवती प्रदक्षिणा घातली, तेव्हा मला त्यांच्या ठिकाणी कामधेनूचे दर्शन झाले. कामधेनूने पूजास्थळी आलेल्या ऋषिपितरांवर कृपाळू दृष्टी टाकली. त्यामुळे पितरांना गती मिळाली आणि त्यांना कामधेनूच्या पोटात अन् पायात स्थान प्राप्त झाले. अशा प्रकारे काही ऋषिपितरांना (दिवंगत साधकांना) गोमातेमध्ये स्थान मिळून त्यांना गोलोकाची प्राप्ती झाली. (गोलोक उच्च स्वर्गलोकाच्या पुढे आहे.)

(क्रमश:)

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०१९, रात्री ११.३५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक