घनकचर्‍याची विल्हेवाट न लावणार्‍या नगरपरिषदांवर खटले भरा !

हिंदु जनजागृती समितीचे शासनाला आवाहन

वर्धा, २१ सप्टेंबर (वार्ता.) – विधीमंडळामध्ये सादर केलेल्या वर्ष २०१५-१६ लोकलेखा समितीच्या अहवालाप्रमाणे राज्यातील ३४ नगरपालिकांकडून २०८.५१ दशलक्ष लिटर सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता जसेच्या तसे नद्या, तलाव आदी जलक्षेत्रांमध्ये सोडले जाते आणि यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. याच अहवालाप्रमाणे राज्यातील २१,८०० मेट्रीक टन घनकचर्‍यापैकी १५,००० मेट्रीन टन घनकचर्‍याची विल्हेवाट लावली जात नाही. यात दोषी असणार्‍या १९ नगरपरिषदांवर खटले प्रविष्ट करण्यात यावेत, अशी शिफारस हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ सप्टेंबर या दिवशी वर्धा नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदना ‘गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पनांच्या माध्यमातून होणारी गणेशमूर्तीची विटंबना थांबवावी’, ही मागणीही करण्यात आली. हे निवेदन नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांनी स्वीकारले. या वेळी समितीचे श्री. अनुप चौधरी, डॉ. पंडित थोटे, सौ. वंदना कलोडे, प्रशांत बाकडे आदी उपस्थित होते.