कोरोना महामारीच्या काळात करावयाच्या घरगुती गणेशोत्सवाविषयी शंकानिरसन !

१. श्री गणेशचतुर्थी ऐवजी माघी गणेश जयंतीला मूर्ती प्रतिष्ठापना करावी का ?

श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजन हे भाद्रपद मासात करावे, असे धर्मशास्त्र सांगते. चातुर्मासाच्या काळात म्हणजे आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत विनाशकारक आणि तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रता अधिक असते; म्हणूनच या काळात हिंदूंचे अनेक सण-उत्सव येतात. जेणेकरून सण-उत्सव-व्रते यांच्या माध्यमातून व्यक्ती ईश्वराच्या अनुसंधानात राहील. भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणेशलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने यमलहरींचीही तीव्रता अल्प व्हायला साहाय्य होते. त्यामुळे या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने श्री गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

श्री. दामोदर विष्णु वझे

२. बाजारात शाडूच्या मातीची मूर्ती न मिळाल्यास काय करावे ?

श्री गणेशमूर्ती चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून बनवावी, असा शास्त्रविधी आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त अन्य गोष्टींनी श्री गणेशमूर्ती बनवणे योग्य नाही; मग असा  पर्याय आपल्याकडे काय आहे ?, हे पाहूया.

अ. घरीच चिकणमातीची ६-७ इंचाची श्री गणेशमूर्ती बनवू शकतो.

आ. श्री गणेशाची मूर्ती अथवा श्री गणेशाच्या चित्राचे षोडशोपचार पूजन करू शकतो. हे पूजन करत असतांना पूजेतील ‘प्राणप्रतिष्ठा’ हा विधी करू नये. ‘प्राणप्रतिष्ठा’ केलेली मूर्ती नंतर विसर्जित करावी लागते. यासाठी ही दक्षता घ्यावी.

३. शाडूची मूर्ती बनवतांना त्यात झाडाचे बी ठेवावे आणि नंतर मूर्ती कुंडीत विसर्जित करावी, हे शास्त्रसंमत आहे का ?

असे करणे धर्मशास्त्रसंमत नाही. खरे तर हा धर्म न मानणार्‍या पर्यावरणवाद्यांचा प्रचार आहे. तुम्हाला वृक्षारोपण करायचे असेल, तर वर्षातील ३६५ दिवस तुम्ही कधीही करू शकता. पर्यावरणप्रेमासाठी धर्माचरणात परिवर्तन करायची काहीही आवश्यकता नाही.

४. बाजारातून आणलेली मूर्ती ‘सॅनिटाईझ’ करावी का ?

बाजारातून मूर्ती आणतांना आदल्या दिवशीच घरी आणावी आणि १२ घंटे घरातील सात्त्विक ठिकाणी अलगीकरण करून ठेवावी. मूर्ती ‘सॅनिटाईझ’ करू नये. सॅनिटायझर मधील रासायनिक द्रव्यांमुळे मूर्तीचा रंगभेद होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्राच्या नियमानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि तिची शक्ती एकत्रित असतात. या नियमानुसार जरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली नसेल, तरी तिच्यात देवतेचे तत्त्व असते. मूर्तीमध्ये रंगभेद झाल्याने तिच्यातील देवतेच्या तत्त्वाची हानी होऊ शकते.

५. कोरोना महामारीमुळे‘ऑनलाईन’ पूजा योग्य कि अयोग्य आहे ?

सध्याच्या संकटकाळात एकमेकांकडे जाता येत नसल्याने ‘ऑनलाईन’ पूजा हा एक चांगला पर्याय आहे. कर्मकांडामध्ये मंत्रांच्या उच्चाराला आणि पूजकाच्या ईश्‍वराप्रतीच्या भावाला महत्त्व असते.

गुरुजींच्या अनुपस्थितीत श्री गणेशपूजन शास्त्रोक्त पद्धतीने करता यावे, यासाठी सनातन संस्थेने ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ हे ‘ॲप’ विकसित केले आहेत. त्यामध्ये श्री गणेशाची विधिवत् पूजा सांगण्यात आली आहे. ते ‘ ॲप डाऊनलोड’ करून आपणही घरच्या घरी श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता.

६. दीड दिवसच श्री गणेशमूर्ती बसवा, असा सल्ला दिला जात आहे. कसे करावे ?

श्री सिद्धिविनायक व्रतानुसार भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धिविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य उत्सवप्रिय असल्याने तेवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणेशमूर्ती बसवून त्याचा उत्सव करू लागले. एखाद्याच्या कुलाचारात गणपति ५ दिवस असेल आणि त्याला तो दीड किंवा ७ दिवसांचा करायचा असेल, तर तो तसे करू शकतो. त्यासाठी अधिकारी व्यक्तीला विचारण्याची आवश्यकता नाही. पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, दहाव्या, अकराव्या दिवशी किंवा घरातील रूढीप्रमाणे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करावे.

७. कोरोना महामारीच्या काळातील मूर्ती विसर्जनाची बंधने लक्षात घेऊन काय करावे ?

मूर्ती विसर्जनाच्या वेळी जलस्रोतांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सध्या कोरोना महामारीमुळे सामाजिक अंतराचे सरकारी नियम पाळणे आवश्यक आहे. यासाठी श्री गणेशमूर्ती आणतांना, तसेच विसर्जन करतांना घरातील मोजक्याच व्यक्तींनी जावे. मूर्ती विसर्जन करतांना घराजवळील तलाव, विहीर यांमध्ये विसर्जन करावे. या काळात गर्दी होण्याचा धोका अधिक असल्याने सरकारने कोरोनाच्या संदर्भात सांगितलेल्या मार्गदर्शक सूत्रांचे तंतोतंत पालन करणे, हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे.

८. ज्या ठिकाणी कोरोना संसर्गामुळे अडचण निर्माण झाली असून गर्दीच्या ठिकाणी जाऊन मूर्ती विसर्जन करणे शक्य न झाल्यास काय करावे ?

घरात ६-७ इंचाच्या लहान श्री गणेशमूर्तीचे पूजन केले असल्यास दुष्काळ किंवा आपत्कालीन परिस्थितीत उत्तरपूजेनंतर श्री गणेशमूर्ती घराबाहेर न्यावी. तुळशी वृंदावनाच्या जवळ किंवा अंगणात मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मूर्ती विसर्जित करावी. शहरात रहाणार्‍यांना तुळशी वृंदावन किंवा अंगण उपलब्ध नसल्यास त्यांनी घरातच मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मूर्तीचे विसर्जन करावे. मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळल्यानंतर ते पाणी आणि माती पायदळी येणार नाही, अशा रीतीने शमी, रुई, औदुंबर, आपटा, वड, पिंपळ यांसारख्या सात्त्विक वृक्षांना घालावी.

मोठ्या गणेशमूर्तीचे पूजन केले असल्यास ती देवघराजवळ किंवा अन्य सात्त्विक ठिकाणी ठेवावी. या मूर्तीची पूजा करण्याची आवश्यकता नाही. धूळ बसू नये; म्हणून ती खोक्यात किंवा आच्छादनाने झाकून ठेवावी. पुढे श्राद्धपक्ष पूर्ण झाल्यानंतर गर्दी नसतांना ती मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करावी.

संकटकाळाच्या दृष्टीने आम्ही गणेशभक्तांना सूचना करू इच्छितो की, या संकटकाळात शक्यतो छोटी श्री गणेशमूर्तीच पुजावी. शक्यतो मोठी श्री गणेशमूर्ती टाळावी.

९. या वर्षी कोरोना महामारी असल्याने श्री गणेशमूर्ती पुढील वर्षी विसर्जित करावी का ?

श्री गणेशमूर्तीची उत्तरपूजा झाल्यानंतर तिच्यातील गणेशतत्त्व निघून जाते, असे शास्त्र आहे, त्यामुळे कोरोना महामारीचे संकट अल्प झाल्यावर ती मूर्ती विसर्जित करावी. तोपर्यंत ती मूर्ती स्वत:च्या घरी वस्त्राने झाकून ठेवावी. येथे महत्त्वाचे सूत्र म्हणजे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पुढच्या वर्षीपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही.

१०. धातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यास विसर्जनाचे शास्त्र काय ?

श्री सिद्धिविनायकाचे व्रत म्हणून सोने-रूपे या धातूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर ती मातीच्या मूर्तीप्रमाणे विसर्जित करावी. जे नियम मातीच्या मूर्तीला आहेत, तेच नियम धातूच्या मूर्तीला आहेत.

११. काही आध्यात्मिक संस्था निर्माल्य गोळा करून ते खाणीत टाकतात, हे शास्त्रसंमत आहे का ?

असे करणे शास्त्रसंमत नाही. आपल्या क्षेत्रात आध्यात्मिक संस्था अशा प्रकारची धर्मविरोधी कृती करत असतील, तर त्यांना थांबवायला हवे. एरव्ही श्री गणेशमूर्तीच्या समवेत निर्माल्याचेही विसर्जन करायचे असते. निर्माल्यातील चैतन्य पाण्यात विसर्जित झाल्यामुळे पाण्याद्वारे त्या चैतन्याचा समष्टी स्तरावर लाभ होतो; परंतु सध्याच्या आपत्काळात बाहेर जाता येत नसल्याने वैयक्तिक स्तरावर तरी निर्माल्यातील चैतन्याचा लाभ मिळावा, यासाठी निर्माल्य पाण्यात बुडवून काढावे आणि नंतर त्या पाण्याचा वापर स्नानासाठी करावा किंवा ते पाणी अंगणातील फुलझाडांना घालावे. नंतर त्या निर्माल्याचा वापर खत निर्मितीसाठी करावा.

श्री. दामोदर वझे, संचालक, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (१३.७.२०२०)


श्री गणेशाच्या उपासनेच्या अंतर्गत करावयाच्या कृती

”  कोणत्या बोटाने लावावे ? – अनामिकेने

”  गंधाच्या उदबत्तीने ओवाळावे ? – चंदन, केवडा, चमेली

”  संख्या किती असावी ? –  दोन

”  कोणत्या गंधाचे अर्पण करावे  ? – हीना

”  गणेशाला प्रदक्षिणा किती घालाव्यात ? – आठ किंवा   आठच्या पटीत