साधकांना आधार देणारे आणि परिपूर्ण अन् भावपूर्ण सेवा करण्याची तळमळ असलेले ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे खेड (रत्नागिरी) येथील श्री. विजय भुवडगुरुजी !

‘खेड, (रत्नागिरी) येथील श्री. विजय भुवडगुरुजी शाळेत मुलांना ‘साधना’ या भावाने शिकवतात आणि मुलांना घडवतात. ते घरी आणि समष्टीत प्रत्येक सेवा परिपूर्ण अन् भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हस्ताक्षर सुंदर आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि प्रेमळ आहे. त्यांचा अनेक सेवांमध्येही सहभाग असतो. खेड आणि रत्नागिरी येथील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. विजय भुवडगुरुजी

१. स्थिर

‘श्री. भुवडगुरुजी वैयक्तिक जीवनात किंवा साधनेत कितीही अडचणी अथवा कठीण प्रसंग आले, तरी स्थिर असतात. आम्हालाही त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते.

२. प्रेमभाव

२ अ. साधकांना सांभाळून घेणे : ते एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे प्रत्येक साधकाला त्याच्या प्रकृतीनुसार सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात. नवीन साधकांना एखाद्या सेवेचे दायित्व दिले, तरी ती सेवा त्यांना समजेपर्यंत ते साहाय्य करतात आणि ‘ती सेवा कशी करायची ?’, हे प्रेमाने सांगून करवून घेतात. साधकांना काही कौटुंबिक अडचणी आल्यास ते साधकांची विचारपूस करून ती सेवा पूर्ण करतात.’

– श्रीमती महेश्वरी मोहन कुलकर्णी, खेड

२ आ. चूक प्रेमाने सांगणे : ‘मला कौटुंबिक किंवा सेवेविषयी ताण आला, तर मी गुरुजींना भ्रमणभाष करून सांगते. मी पुष्कळ जलद गतीने बोलते. मला बोलण्याचे भान नसते, तरीही ते शांतपणे ऐकून घेतात आणि नंतर मला माझी चूक प्रेमाने सांगतात.

२ इ. अडचणी मनमोकळेपणाने सांगता येणे : मी माझ्या मोठ्या भावाला सांगते, त्याचप्रमाणे त्यांना माझी अडचण मनमोकळेपणाने सांगते. आम्ही आमच्या सर्व अडचणी त्यांना मनमोकळेपणाने सांगतो.’

– सौ. स्नेहल संदीप तोडकरी, खेड

२ ई. साधकांना गुण-दोषांसह स्वीकारणे : ‘ते साधकांना त्यांच्यातील गुण आणि स्वभावदोष यांसह स्वीकारतात. ते साधकांतील गुणांचा अभ्यास करून त्यांच्याकडून योग्य प्रकारे सेवा करवून घेतात, तसेच साधकांना त्यांच्यातील चुकांची जाणीव शांतपणे करून देतात. त्या वेळी ते ‘साधक दुखावला जाणार नाही’, याची काळजी घेतात.’

– श्रीमती महेश्वरी मोहन कुलकर्णी

२ उ. साधकांकडून सेवा वेळेत करवून घेणे : ‘प्रत्येक साधकाकडून ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वितरण, वसुली आणि नूतनीकरण या सेवा वेळेत पूर्ण व्हाव्यात’, असा त्यांचा प्रयत्न असतो. ते प्रत्येक साधकामधील गुण आणि कौशल्य ओळखून सेवा देतात अन् सेवेचा पाठपुरावा घेऊन ती वेळेत करवून घेतात.

२ ऊ. साधकांना आधार देणे

१. एखाद्या साधकाला सेवा जमत नसल्यास ते स्वतः त्याच्याकडे जाऊन ती सेवा साधकाला समजावून सांगतात. त्यांनी सेवेतील अडचणी सोडवल्याने सर्व साधकांना गुरुजींचा आधार वाटतो. साधक आनंदाने सेवा करतात.

२. सेवा करतांना साधकांकडून झालेल्या चुकांची गुरुजी त्यांना प्रेमाने जाणीव करून देतात. त्यामुळे त्यांची साधकांशी जवळीक होते. प्रत्येक साधक अंतर्मुख होऊन सेवा करतो. त्यामुळे साधकांना गुरुजींचा आधार वाटतो.’

– सौ. स्नेहल संदीप तोडकरी

२ ए. साधकांना सेवेत साहाय्य करणे : ‘काही साधक दिवाळी आणि मे मासाच्या सुटीत गावाला जातात. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करायला अडचण येते. तेव्हा गुरुजींची शारीरिक क्षमता नसूनही (ते एका पायाने अधू आहेत.) ते वितरणाची सेवा दायित्व घेऊन पार पाडतात. एखाद्या साधकाने एखादे दायित्व स्वीकारले नाही, तर ते स्वतः ती सेवा दायित्व घेऊन पूर्ण करतात.

३. सकारात्मक

त्यांच्या मनात कोणत्याही साधकाविषयी नकारार्थी विचार नसतात. ते इतरांनाही सकारात्मक रहाण्यास प्रवृत्त करतात. ‘गुरुदेवांनी दिलेल्या सेवेचा लाभ इतरांना मिळावा’, यासाठी ते प्रयत्न करतात.’  – श्री. शैलेश लक्ष्मण सकपाळ, भडगाव, खेड.

४. सेवाभाव

४ अ. ‘गुरुजी प्रत्येक सेवा अचूक आणि ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ होईल’, अशी करण्याचा प्रयत्न करतात.’

– श्रीमती महेश्वरी मोहन कुलकर्णी

४ आ. ‘ते ‘प्रत्येक सेवा हा साधकांच्या प्रगतीसाठी गुरुदेवांनी दिलेला प्रसाद आहे’, या भावाने प्रामाणिकपणे स्वीकारतात. ते साधकांना प्रेमाने सेवेचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून सेवा करवून घेतात.’ – सौ. स्नेहल संदीप तोडकरी

४ इ. ‘गुरुजींना अनेक शारीरिक अडचणी आहेत, तरीही एकदा त्यांनी ३ घंटे देहभान विसरून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा केली.’ – श्री. शैलेश लक्ष्मण सकपाळ

४ ई. साहित्याची मागणी अभ्यासपूर्ण देऊन साहित्य मिळाल्याचा आढावा देणे : ‘गुरुजी सेवा समजून घेतात आणि ती परिपूर्ण करतात. ते तपासणीचे साहित्य क्रमवार आणि नीटनेटके लावून ठेवतात. त्यामुळे तपासणी करणे सोपे जाऊन सेवा लवकर होते. ते तपासणीला स्वतः उपस्थित असतात. गुरुजींना भ्रमणभाषवरून ऐन वेळी कोणत्याही साहित्याची मागणी केली, तरी ते घेतात. ते अभ्यासपूर्ण मागणी देतात आणि साहित्य मिळाल्याचा आढावाही देतात.’ – श्री. प्रभाकर सुपल, रत्नागिरी

४ उ. वस्तूंच्या नोंदी व्यवस्थित करणे : ‘ते दैनिक ‘सनातन प्रभात’, ग्रंथ, आकाशकंदील, शुभेच्छापत्र आणि भेटसंच यांच्या मागण्या वेळेत अन् अभ्यासपूर्ण करतात. त्यांच्या सर्व नोंदी व्यवस्थित केलेल्या असतात. त्यांच्यामध्ये गुरुकार्य होण्याची आणि साधकांच्या व्यष्टी अन् समष्टी साधनेची तळमळ दिसते.

४ ऊ. सेवेत सवलत न घेणे : त्यांना प्रत्येक साधकाच्या क्षमतेचा अभ्यास आहे. ते मला प्रकृतीची काळजी घेऊन सेवा करायला सांगतात. ते एका पायाने अधू आहेत; पण त्यांनी त्याचा कधीही बाऊ केला नाही. त्यांना मधुमेहाचा आणि मणक्याचा त्रास आहे. मे २०१९ मध्ये त्यांचे मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झाले. त्या काळातही त्यांनी सेवेत सवलत घेतली नाही. ते नेहमी कार्यपद्धतीनुसार आणि वेळेत सेवा करतात.’

– सौ. स्नेहल संदीप तोडकरी

५. कर्तेपणा नसणे

अ. ‘त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या सेवा आहेत, तरीही ‘हे मीच का करावे ?’ किंवा ‘नेहमी मीच करतो’, असे ते कधी म्हणत नाहीत.’ – श्रीमती महेश्वरी मोहन कुलकर्णी

आ. ‘ते सेवेचे कर्तेपण गुरुचरणी अर्पण करतात.’ – सौ. स्नेहल संदीप तोडकरी

६. ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्व अडचणींवर मार्ग काढतील’, असा त्यांचा भाव असतो.’

– सौ. स्नेहल संदीप तोडकरी

(जानेवारी २०१९)