हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर एकाच पद्धतीने होणारे आघात म्हणजे नियोजित षड्यंत्रच ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

रमेश शिंदे

१. आंध्रप्रदेशात सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये घेते, तर ते मंदिरांना सुरक्षा का पुरवत नाहीत ? दोनशेहून अधिक मंदिरांत एकाच पद्धतीने आघातांच्या घटना घटतात, तेव्हा ते हिंदूंच्या श्रद्धांचे हनन करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे सरकारला का कळत नाही ?

२. यापूर्वी गोव्यामध्येही मंदिरांच्या तोडफोडीच्या घटना झाल्या. तरीही ‘हे सर्व चोरीच्या कारणांमुळे झाले’, असे सांगण्यात आले. ‘चोर्‍या करून मूर्ती तोडणे, हे चोरीच्या उद्देशालाच खोटे ठरवते’, असे कुणालाही वाटल्यास चूक ठरणार नाही; मात्र तत्कालीन सरकार या गोष्टींवर पांघरूण घालत राहिले आणि देशातील हिंदु समाजाला निधर्मीवादाच्या नावाखाली भ्रमित करत राहिले.

३. कर्नाटकात ५-६ चर्चवर केवळ दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर भारतातील चर्च धोक्यात असल्याचा प्रचार करून आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवला गेला; पण शेकडो मंदिरांवर आक्रमणे होऊनही त्याला गांभीर्याने घेतले जात नाही.

४. अन्नपुरवठा मंत्री कोडाली नानी म्हणतात की, हिंदु देवतांची मूर्ती फोडल्याने देवतांवर कोणताही परिणाम होत नाही. हेच मत चर्चमधील मूर्तींविषयी अथवा मशिदीविषयी केले जाते का ?

५. ‘आंध्रप्रदेश प्रोपॅगेशन ऑफ आदर रिलिजन इन द प्लेसेस ऑफ वरशिप ऑर प्रेयर प्रोहिबिशन ऑर्डिनन्स २००७’ (प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी अन्य धर्मियांच्या धर्मप्रसारास प्रतिबंध करणारा कायदा) या अंतर्गत हिंदूंच्या मंदिर परिसरात अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचा प्रसार करू शकत नाहीत. या कायद्याला तिथे त्वरित लागू करण्याची आवश्यकता आहे. या सर्व समस्या रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय आहे.