नेपाळमध्ये कोरोनामुळे भारतापेक्षाही वाईट स्थिती निर्माण होण्याची भीती

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोनाच्या संसर्गावर वेळीच नियंत्रण न आणल्यास नेपाळमधील स्थिती भारतापेक्षाही अधिक वाईट होईल’, अशी चेतावणी तज्ञांनी दिली आहे. नेपाळ सरकारने साहाय्यासाठी इतर देशांना आवाहन केले आहे.

१. नेपाळमध्ये सध्या प्रत्येकी १ लाख लोकांमागे २० जणांना कोरोनाची लागण होत आहे. हीच स्थिती भारतात २ आठवड्यांपूर्वी होती. मागील आठवड्यात करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत ४४ टक्के लोक कोरोनाबाधित आढळले आहेत.

२. नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. समीर अधिकारी यांनी सांगितले की, ३ कोटी लोकसंख्या असलेल्या नेपाळमध्ये एक मासापूर्वी प्रतिदिन १०० च्या आसपास कोरोनाबाधित आढळत होते. २ दिवसांपूर्वी नेपाळमध्ये एकाच दिवशी ८ सहस्र ६०० हून अधिक बाधित आढळले. नेपाळमध्ये वाढत असणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भारतामुळे संसर्ग वाढत असल्याचा आरोप

भारत-नेपाळ सीमा चालू आहेत. अनेक भारतीय हवापालट करण्यासाठी आणि चांगले उपचार घेण्यासाठी नेपाळमध्ये आले होते. त्यामुळे नेपाळमधील संसर्ग वाढला आहे, असा दावा एका अधिकार्‍याने केला.