हिंदु राष्ट्र आले तरच गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी संकटे दूर होऊ शकतील ! – स्वामी श्रद्धानंद महाराज

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

हरिद्वार, ८ एप्रिल (वार्ता.) – तुम्ही जे हिंदु राष्ट्रासाठी कार्य करत आहात ते चांगले आहे. हिंदु राष्ट्र आले तरच गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी संकटे दूर होऊ शकतील, असा विश्‍वास झारखंड येथील गोड्डा जिल्ह्यातील अध्यात्म अन् स्वदेशीचे प्रखर वक्ता, शाही पिठाधीश्‍वर स्वामी महर्षि मेंहीं हृदय धामचे स्वामी श्रद्धानंद महाराज यांनी येथे व्यक्त केला. या प्रसंगी स्वामी गुरुप्रसादजी महाराज उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या संपर्क अभियानाच्या वेळी समितीसेवकांनी त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि राष्ट्र यांच्या संदर्भातील चित्रमय प्रदर्शन असलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री राजेश उमराणी आणि हरिकृष्ण शर्मा हेही उपस्थित होते.

स्वामी श्रद्धानंद महाराज म्हणाले की,  आमचे आश्रम बिहार, झारखंड येथे असून आमचे गुरु पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या विरोधात आहेत. मी स्व. राजीव दीक्षित यांच्या विचारांनी प्रेरित असून आमच्या आश्रमात सायंकाळी ७ वाजता कीर्तन चालू होते. यामध्ये तुम्ही तुमचा विषय मांडण्यासाठी आवर्जून या, असेही ते म्हणाले.