‘परात्पर गुरुदेव सतत समवेत आहेत’, असा भाव अनुभवणारे सनातनचे संत पू. जयराम जोशी !

पू. जयराम जोशीआजोबा

१. मुलीला अपघातातून गुरूंनीच वाचवले असल्याचे सांगणे आणि तिला गुरूंची महती सांगून आत्मनिवेदन करण्यास सांगणे

‘नोव्हेंबर २०२० मध्ये गाडी अकस्मात् घसरल्यामुळे आमचा अपघात झाला. त्यात माझ्या खांद्याचा अस्थिभंग झाला आणि यजमानांना खरचटले. गुरुदेवांच्या कृपेमुळे त्या वेळी रस्त्यावर इतर कोणतेही वाहन आले नाही. त्यामुळे आम्ही दोघेही वाचलो. ही केवळ गुरुमाऊलींची कृपा ! मी ही अनुभूती पू. बाबांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुला वाचवणारी परम पूज्य गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉ. आठवले) होती. त्यांनी तुला मोठ्या संकटातून वाचवले आहे. आता तू इतरांशी बोलण्यापेक्षा त्यांनाच सर्वकाही सांगत जा. सतत त्यांच्याशी बोलत रहा. गुरुमाऊली आपल्याला कधीच त्यांच्यापासून लांब ठेवणार नाही. तू मनात कोणताही नकारात्मक विचार आणू नकोस.’’

सौ. आरती प्रसाद म्हैसकर

२. पू. बाबांनी परात्पर गुरुदेवांकडे इतर काही न मागता केवळ ‘साधना करण्यासाठी शक्ती द्या’, असे मागण्यास सांगणे

पू. बाबा फार प्रेमळ आहेत. ते गुरुदेवांशी सतत बोलत असतात. त्यांच्या मुखात केवळ ‘गुरुमाऊली, गुरुमाऊली’ असे शब्द असतात. मला ते नेहमी सांगतात, ‘‘गुरुदेवांजवळ काही मागू नकोस. त्यांनी आपल्याला पुष्कळ काही दिले आहे. त्यांच्याकडे केवळ ‘साधना करण्यासाठी शक्ती द्या’, असे माग. कोणतीही अपेक्षा करू नकोस.

३. ‘मी एकटा नसून परात्पर गुरुदेव माझ्या समवेत असून आम्ही एकमेकांशी बोलतो’, असे पू. बाबांनी सांगणे

मी पू. बाबांना संपर्क केल्यावर ‘तुम्ही खोलीत एकटेच आहात का ?’, असे विचारल्यावर ते म्हणतात, ‘‘मी एकटा नाही. परात्पर गुरुदेव आणि मी असे आम्ही दोघे आहोत. आम्ही एकमेकांशी बोलत असतो.’’

– सौ. आरती प्रसाद म्हैसकर (मुलगी), रत्नागिरी (१३.३.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक