सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा साधकांना सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांचे शंकानिरसन करून त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन केले. यातील सूत्रे येथे दिली आहेत. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. साधकांनी अनुभूतींचा विचार करत रहाण्यापेक्षा तोच वेळ साधनेला द्यावा !

एक साधक : ‘नमस्कार गुरुदेव. वर्ष २०१७ मध्ये मी प्रथमच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलो होतो. त्या वेळी मी तुमची ध्वनीचित्रफित पाहिली होती. त्यामध्ये प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा), प.पू. बेजन देसाई आणि तुम्हीसुद्धा होतात. काही दिवसांनी मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात ‘मी आश्रमात पाहिलेल्या ध्वनीचित्रफितीत दाखवल्याप्रमाणे सत्संग चालू होता आणि तेथे तुम्ही तिघेजण मला दिसत होतात. सत्संग संपल्यानंतर प.पू. बाबांनी नुकतेच झाडावरून काढलेले तीन नारळ परातीत ठेवले आणि ते मला दिले.’ ‘मी प.पू. बाबा आणि प.पू. बेजन देसाई यांना पाहिलेले नाही, तरीही त्यांनी मला स्वप्नात दर्शन दिले’, याचे कारण मला समजले नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अशा अनुभूतींचा विचार करायचा नाही. याचे कारण ‘कुठल्या जन्मात काय झाले आहे ?’, ते आपल्याला समजत नाही. ‘समजा २, ४, ५ किंवा १० जन्मांपूर्वी मी तुमच्याकडून नारळ घेतले असतील आणि ते मी या जन्मात तुम्हाला परत दिले की, आपला देवाण-घेवाण हिशोब संपला’, हे एक उदाहरण आहे. अशी अनेक कारणे असतात. आपण सतत असाच विचार करत राहिलो, तर अनेक वेळा वाईट शक्ती आपल्या मनात काहीतरी चुकीचा विचार घालतात आणि साधकांच्या मनात विकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कुठल्याही अनुभूतीविषयी विचार करायचा नाही. तोच वेळ आपण आपल्या साधनेसाठी द्यायचा.

दुसरा साधक : गुरुदेव, देवाण-घेवाण हिशोब अर्पण केल्याने न्यून होतात का ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. आपण निरपेक्षतेने देत रहायचे आहे. केवळ घेत रहायचे नाही.

२. जिज्ञासू व्यक्तींनाच साधना सांगायची ! इतर व्यक्तींना साधना सांगण्यात वेळ फुकट घालवण्यापेक्षा स्वतःच्या साधनेकडे लक्ष द्या !

एक साधिका : आपल्याला समाजाला साधना शिकवायची आहे आणि स्वतःही शिकायची आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : असे नाही. जिज्ञासूच ज्ञानाचा अधिकारी आहे. इतर संप्रदायातील व्यक्तींना ‘आमची साधना श्रेष्ठ, तुमची साधना कनिष्ठ’, असे सांगण्यात वेळ घालवायचा नाही. ऐकणारी व्यक्ती जिज्ञासू असेल, तरच तिला साधनेविषयी सांगा. उगाच वेळ फुकट घालवायचा नाही. तो वेळ आपली साधना आणि नामजप यांना द्यायचा.

३. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ६०, ७० टक्क्यांच्या पुढे गेली की, तिला सर्व विश्वच आपले वाटू लागते !

एक साधिका : मी अधिकाधिक वेळ घरातील कामांनाच महत्त्व देते आणि उपलब्ध वेळ साधनेला देते. त्यामुळे ‘माझी साधना अल्प होत आहे’, असे मला वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : साधकाची आध्यात्मिक पातळी ६०, ७० टक्क्यांच्या पुढे गेली की, केवळ आपले घरच नाही, तर सर्वच आपले वाटते. कोणत्याही संप्रदायाचे साधक असोत, तेसुद्धा आपलेच वाटतात. ‘देवाला कसे सगळे विश्वच आपले आहे’, असे वाटते ना ?, तसेच आपले होते. आपल्याला सर्वच आपले वाटू लागतात. प्रगती झाली की, आपण ईश्वराशी एकरूप होतो.’

४. साधकाची प्रार्थनेप्रती असलेली श्रद्धा !

तिसरा साधक : नमस्कार. वर्ष २०१८ मध्ये माझे वजन ५० किलो झाले होते. मला वर्ष २०१९ मध्ये मोठा आजार झाला होता. तेव्हा एका वर्षात माझे वजन ३२ किलो झाले. मी आधुनिक वैद्यांकडे गेलो. तेव्हा त्यांनी मला सहा मास गोळ्या आणि औषधे घ्यायला सांगितली. त्या आधी मी देवाला ‘मला हिंदु राष्ट्र पहायचे आहे. मला या आजारातून वाचवा’, अशी प्रार्थना करत होतो आणि त्यानेच मला या संकटातून बाहेर काढले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आधुनिक वैद्यांना प्रार्थनेविषयी काय कळणार ? छान ! तुमची किती श्रद्धा आहे !

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.