पाटण (जिल्हा सातारा) येथे संतप्त नागरिकांनी रस्ते खोदण्याचे काम बंद पाडले !

प्रशासन यामध्ये स्वतःहून लक्ष का घालत नाही ? जे नागरिकांना दिसते, ते प्रशासनाला का जाणवत नाही ? ‘असे असंवेदनशील प्रशासन काय कामाचे’, असा प्रश्‍न जनतेला पडल्यास चूक ते काय ?

सातारा, १८ मार्च (वार्ता.) – एका भ्रमणभाष आस्थापनाची ‘केबल’ टाकण्यासाठी पाटण (जिल्हा सातारा) येथील मुख्य पेठेतील रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आला आहे. मुख्य पेठेतील रस्ता असूनही हे काम जलदगतीने केले जात नाही. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तुटत आहेत. व्यापार्‍यांच्या दुकानांमध्ये, रस्त्यावरील घरांमध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिक खड्ड्यात पडून मोठे अपघात घडत आहेत. या सर्व गोष्टींना कंटाळून संतप्त होऊन स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांनी रस्ते खुदाईचे काम बंद पाडले.