साखर कारखाना उसाची तोडणी करत नसल्याने शेतकर्‍याने उसाच्या शेताला लावली आग !

करंजगाव (जिल्हा नगर) येथील घटना

नगर – मुळा सहकारी साखर कारखाना जाणीवपूर्वक ऊसतोड करत नसल्याचा आरोप करून जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील करंजगाव येथील अशोक टेमक या शेतकर्‍याने स्वतःच्या शेतातील उसाला आग लावली. करंजगावातील शेतकर्‍यांनी ऊस ज्वलन आंदोलनाद्वारे आपला संताप व्यक्त केला, तर राजकीय विरोधातून ही ‘स्टंटबाजी’ केली जात आहे, असे साखर कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे.

‘केवळ राजकीय विरोधक असल्याने मुळा सहकारी साखर कारखाना माझ्यावर अन्याय करत आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखाना चालवला जातो. अनेकदा ऊस नोंद करायला जाऊनही नोंद घेतली जात नाही’, असे अशोक टेमक यांचे म्हणणे आहे.

मुळा सहकारी साखर कारखाना परिसरात ३४ लाख टन उसाचे क्षेत्र आहे. साखर कारखाना १४ लाख टन उसाचे गाळप करू शकतो. ज्या ३० सहस्र शेतकर्‍यांनी कारखान्याकडे ऊसाच्या नोंदी केल्या आहेत, त्यांच्या ऊसाची अगोदर तोड होणार आहे. एकाचवेळी सगळा ऊस कसा तोडला जाऊ शकतो ? शेतकर्‍याने ऊसाची नोंदही केलेली नाही. त्यामुळे हा प्रकार केवळ ‘राजकीय स्टंटबाजी’ आहे. गडाखांची अपर्कीती करण्यासाठी हे चालू आहे, असे या साखर कारखान्याचे अध्यक्ष नाना तूवर यांनी सांगितले.