मकर राशीतील ७ ग्रहांच्या मिलनामुळे भारतात तणावपूर्ण परिस्थिती बनू शकते ! – ज्योतिषांचा दावा

येणारा काळ हा संकटकाळ असणार असल्याचे ज्योतिषी आणि संत-महंत सांगत आहेत. हे लक्षात घेता साधनेची अपरिहार्यता आपल्या लक्षात येते !

नवी देहली – ९ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजून ३१ मिनिटांनी चंद्राने मकर राशीत प्रवेश केला आहे. मकर राशीत आधीपासूनच सूर्य, गुरु, शुक्र, शनि, बुध आणि प्लुटो या ग्रहांची उपस्थिती आहे. ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्र यांनी म्हटले आहे की, चंद्राच्या प्रवेशानंतर या ७ ग्रहांचे मिलन झाले आहे. या योगाचा भारतावर विशेष परिणाम पहायला मिळणार आहे; कारण भारताची वृषभ लग्नाची कुंडली आहे. या कुंडलीचे तिसरे घर म्हणजेच कर्क राशीत सूर्य, बुध, शुक्र, शनि आणि चंद्र या ५ ग्रह आधीपासून बसले आहेत. आता हा योग मकर राशीत होत आहे. त्यांच्यात एकमेकांची दृष्टी असेल आणि राहूची यावर लक्ष असेल. या परिस्थितीत भारतात तणावपूर्ण परिस्थिती बनू शकते. राजकीय गोंधळदेखील पहायला मिळू शकतो. अपघातांची संख्या आणि महागाई वाढू शकते. या काळात जगात भारताचे वर्चस्व आणि सामर्थ्यदेखील वाढेल. जगातील सर्व देशांमधील बैठकीत भारत विशेष भूमिका बजावेल.

७ ग्रहांच्या मिलनाचा परिणाम !

१. भारतात तणाव वाढण्याची शक्यता
२. नैसर्गिक आपत्तीसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता
३. विश्‍वयुद्धाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
४. कोरोना महामारी आणखी प्रबळ होण्याचा अंदाज
५. आणखी काही विषाणूसदृश्य आजारांची शक्यता
६. मनुष्यहानी आणि वित्तहानी होण्याचा अंदाज
७. भारतात राजकीय उपद्रव वाढण्याची शक्यता