शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराचा भारतमाता की जय संघटनेकडून निषेध !

पणजी (पत्रक) – देहलीत चाललेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुखवट्याखाली, पवित्र प्रजासत्ताकदिनीच तलवारी, भाले, लाठ्या यांसारख्या शस्त्रांनिशी पोलिसांवर करण्यात आलेली आक्रमणे, मार्गावर झालेला हिंसाचार आणि विशेषतः ऐतिहासिक लाल किल्ल्यावर चढवण्यात आलेला तिरंगा राष्ट्रध्वज ध्वजस्तंभावर चढून, उखडून अक्षरशः फेकून देऊन अन् त्या ठिकाणी खालसा पंथाचा झेंडा लावण्याची करण्यात आलेली कृती या सर्व निंदनीय गोष्टींचा भारतमाता की जय संघ कडाडून निषेध करत आहे.

अशा प्रकारच्या हिंसाचाराला लोकशाहीत अजिबात थारा नाही. हा प्रकार म्हणजे देशाचे स्वातंत्र्य, एकात्मता आणि अखंडता यांसाठी सर्वस्वाचे बलीदान दिलेल्या समस्तांचा  घोर अपमान आहे. राष्ट्र ते कदापि सहन करणार नाही. राष्ट्रीय मानचिन्हांवर आक्रमणे करणार्‍यांची गय न करता, या हिंसाचारास उत्तरदायी असणार्‍यांवर केंद्र सरकारने कडक कारवाई करावी.