‘ऑनलाईन’ नामजप सत्संग ऐकणार्‍या ठाणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

ठाणे येथील जिज्ञासूंना ‘ऑनलाईन’ नामजप सत्संग पुष्कळ आवडले. दळणवळण बंदी उठल्यानंतरही सत्संग चालू ठेवण्याविषयी त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांपैकी काही प्रातिनिधिक अभिप्राय आणि त्यांच्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. श्री. अभिजित वैद्य

१ अ. देवतापूजनातील उपकरणे आणि इतर साहित्य यांविषयीचे विवेचन आवडणे  

२. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘अक्षतांचे महत्त्व’ याविषयी फार छान आणि विस्तृत माहिती सांगितली. ती सूत्रे मला ठाऊक नव्हती. त्यांनी दिवा, कापूर आणि उदबत्ती यांचे महत्त्व उत्कृष्टपणे सांगितले, तसेच ‘नैवेद्याचे ताट कसे वाढावे ? त्यावर मीठ का वाढू नये ?’, याविषयी उत्कृष्ट माहिती दिली. ‘नारळ आणि त्याचे पूजेमधील तंत्रज्ञान’ याविषयी त्यांनी छान सांगितले.

३. देवतापूजनामधील ‘जलाचे महत्त्व’ या अंतर्गत सद्गुरूंनी ‘सत्कर्म शुद्ध पद्धतीने केले, तरच त्याचा लाभ होतो’, असे सांगितले. त्यामुळे ‘पूजेचीही शात्रशुद्ध पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे’, हे लक्षात आले. सद्गुरूंनी ‘जल हे जीवन असून पवित्र आहे. जलात देवतांचा वास असतो. जलामध्ये चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपित करण्याची शक्ती अधिक असते. सप्तनद्यांचे, म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधु, कावेरी आणि गोदावरी यांचे महत्त्व, त्यांना आकृष्ट करण्याचे मंत्र अन् त्यांना आवाहन कसे करायचे ?’, याविषयी छान सांगितले, तसेच ‘कलशाचा विशिष्ट आकार जलदेवतेचे अस्तित्व कसे आकृष्ट करते ?’ याविषयी सुंदर विवेचन केले. ‘या सर्वांमुळे आध्यात्मिक आणि सात्त्विक संतुष्टी प्राप्त होते’, असेही त्यांनी सांगितले. हा सर्वच भाग मला पुष्कळ आवडला.

४. ‘देवतापूजनात पवित्र तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व आणि तुळशीची उत्पत्ती’ याविषयी सद्गुरूंनी छान माहिती दिली. त्यांनी स्कंदपुराण आणि पद्मपुराण यांतील आधार उद्बोधित केला. ‘स्त्रियांनी तुळस का तोडू नये ?’, याविषयीही त्यांनी माहिती दिली. तुळशीविषयीच्या विधी-निषेधाचे सूत्र सांगितले. ‘दुपारनंतर तुळस का तोडू नये ? नैवेद्यावर तुळस का आणि कशी घालावी ?’, याविषयी ऊहापोह केला. तुळशीच्या मंजिरीचे अतीसूक्ष्म वलय आणि तिचे सामर्थ्य सांगितले. त्याच समवेत त्यांनी ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म कसे श्रेष्ठ असते ?’, हे सांगितलेे. गंगेसमान पवित्र आणि वातावरण शुद्ध करणार्‍या तुळशीविषयी उत्कृष्ट माहिती दिल्यासाठी धन्यवाद !

५. सद्गुरूंनी देवपूजेच्या अंतर्गत बिल्वपत्रांचे पूजेमधील महत्त्व छान सांगितले. त्यांनी पिंपळ, औदुंबर, अशोक, आंबा आणि वड (वट) या पंचपत्रांचे आध्यात्मिक महत्त्व’ याविषयी माहिती सांगितली, तसेच ‘बिल्वपत्राचे विधी-निषेध’ याविषयीही सुंदर विवेचन केले. मला हा कार्यक्रम आवडला. उपयुक्त माहिती दिल्यासाठी धन्यवाद !

१ आ. ‘हे सत्संग उत्कृष्ट आणि विचार करायला लावणारे आहेत’, असे सांगणे : मी ‘कर्मफल’ या विषयावरील काही सत्संग ऐकले. हे सत्संग उत्कृष्ट, ज्ञानवर्धक आणि सखोल विचार करायला लावणारे आहेत, यात काहीच शंका नाही. त्यामुळे आपण त्या दृष्टीनेे विचार करायला लागतो. या विषयांची एखादी वाहिनी असती, तर अधिक चांगले झाले असते.

‘वहिनी (त्यांच्या संपर्कात असणार्‍या सनातनच्या साधिकेला ते ‘वहिनी’ म्हणतात.), या दळणवळण बंदीच्या काळात तुम्ही नियमित ‘लिंक’ पाठवल्यामुळे ‘माझे थोडे ज्ञानवर्धन झाले’, असे म्हणायला मी संकोच करणार नाही. ‘लिंक पाठवणे असेच चालू असू द्या. सत्संगातून शास्त्रोक्त माहिती दिल्यासाठी धन्यवाद ! या सत्संगांसाठी मी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे सहृदय आभार मानतो.’

२. सौ. संचिता संभूस

२ अ. अभिप्राय

१. ‘सत्संग ऐकल्यावर मला पुष्कळ शांत आणि सकारात्मक वाटते. सत्संग ऐकत असल्यामुळे मला पुढच्या कामांसाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. सत्संगात पुष्कळ चांगली माहिती मिळते. सत्संग ऐकून पुष्कळ समाधान मिळते. त्यासाठी कृतज्ञता !

२. मी प्रतिदिन २ सत्संग ऐकते. या दळणवळण बंदीच्या काळात सत्संगामुळे मी स्वतःचा ताण घालवण्याचे पुष्कळ चांगले नियोजन करू शकले. माझी कार्यक्षमता पुष्कळ वाढली असून माझ्या कामात सातत्य आले आहे. माझी धरसोड वृत्ती पुष्कळ न्यून झाली. याचे सर्व श्रेय मी या सत्संगांना देते. ‘हे सत्संग असेच चालू रहावेत’, अशी ईश्‍वर चरणी मनःपूर्वक प्रार्थना करते आणि श्रीकृष्णाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

२ आ. अनुभूती

१. आजचा माझा नामजप नेहमीपेक्षा अधिक एकाग्रतेने झाला. नामजप ऐकतांना संत आणि साधिका एका संरक्षक कवचात दिसले. ते कवच श्रीकृष्णाकडून येणार्‍या सात्त्विक स्पंदनांनी भरलेले दिसत होते.

२. मला सत्संगात सतत श्रीराम, तसेच भगवान शिव तांडव नृत्य करतांना दिसतो.

३. आज मला सत्संग ऐकतांना एक वेगळीच अनुभूती आली. सत्संग ऐकतांना मला पिवळसर सोनेरी प्रकाश दिसत होता. ‘तिथे श्रीराम शिवधनुष्याला बाण लावून उभा आहे’, असे मला दिसत होते. माझ्या मनातील सर्व नकारात्मक भावना तिथे जाऊन नष्ट झाल्या. त्या वेळी मला पुष्कळ शांत वाटलेे.’

३. सौ. श्रद्धा जोशी

अ. ‘२९.३.२०२० या दिवशी सकाळी मी नामजप सत्संग ऐकला आणि मला पुष्कळच छान वाटले. माझ्या मनावर अकारण आलेला ताण दूर झाला आणि ‘मन पिसासारखे हलके झाले आहे’, असे मला जाणवले.

आ. १०.४.२०२० या दिवशी मी सकाळी झालेला सत्संग ऐकला आणि सायंकाळी झालेला धर्मसंवाद ऐकला. ‘पितृदोष आणि वास्तूदोष यांविषयी छान माहिती मिळाली’, त्यासाठी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करते.

इ. अनुभूती : ‘श्रीकृष्णाचा नामजप करतांना ‘ॐ’ने संपूर्ण आकाश व्यापून टाकले आहे’, असे मला जाणवत होते. डोळे मिटल्यावर मला परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या छायाचित्राप्रमाणे दिसत होते. तेव्हा माझे मन भरून येऊन डोळ्यांतून अश्रू आले. नामजपात भावपूर्ण सहभागी होता आले. यासाठी परमेश्‍वराच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

४. रूपाली कासले

अ. ‘सत्संगात ‘देवतापूजनातील दिव्याचे महत्त्व’ याविषयीची सूत्रे विस्तृतपणे सांगितली. तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा यांतील भेद अन् त्यापासून होणारा लाभ याविषयी कित्येकांना ठाऊकच नसते. ती माहिती ठाऊक असणे पुष्कळ आवश्यक आहे. या सत्संगात ती माहिती छान सांगितली.

आ. ‘नामजपाची वेळ, ठिकाण, बैठक आणि दिशा’ यांविषयी सद्गुरु जाधवकाकांनी पुष्कळ छान माहिती समजावून सांगितली.

इ. श्रद्धा वाढवणारी कथा ऐकून मन हेलावून गेले आणि नकळत डोळ्यांत पाणी दाटले. ‘देवाच्या आणि संतांच्या सान्निध्यात केलेल्या नामजपाने श्रद्धा दृढ होते’, हे खरेच आहे. सद्गुरूंना नम्र अभिवादन !’

५. सौ. चंदा इंदुलकर

अ. ‘नामजप सत्संग पुष्कळ छान आहे. माझे नामस्मरण चांगले होते. आम्ही तो सत्संग रात्री झोपतांना ऐकतो. त्यामुळे रात्रभर नामजप चालू रहातो.

आ. सत्संगातून धर्माचरणाच्या सर्व गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि संस्काराचा विषय पुष्कळ आवडला.

इ. बालसंस्कार सत्संगही पुष्कळ चांगला असतो.’

६. सौ. सीमा जोशी 

‘आम्ही सनातन संस्थेचे ‘ऑनलाईन’ सत्संग आणि धर्मसंवाद प्रतिदिन ऐकतो. ते पुष्कळ छान आहेत आणि त्यातून उपयुक्त माहिती मिळते. या सत्संगात मिळणारी माहिती अन्य कुठेच मिळत नाही.

अ. ‘कर्मफल सिद्धांत आणि सोळा संस्कार’ यांविषयी अत्यंत सोप्या भाषेत छान पद्धतीने समजावून सांगितले. कर्मफल सिद्धांत समजल्यामुळे काही वाईट घडले, तरी ‘त्याचा दोष इतरांना द्यायला नको. ते आपल्याच कर्माचे फळ असते’, असे लक्षात आले. त्यामुळे माझे इतरांकडून अपेक्षा करणे न्यून झाले. कुणी वाईट वागले, तर पूर्वी मला पुष्कळ त्रास व्हायचा; पण आता तेवढा त्रास होत नाही.

आ. सनातनने आधीच ‘आपत्काळ येणार आहे’, असे सांगितले होते; पण तेव्हा त्याचे महत्त्व समजले नव्हते. आता ते समजत आहे.  सनातनच्या ‘ऑनलाईन’ सत्संगामुळे साधनेचे महत्त्व समजले.’

(क्रमशः)

भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/444265.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक