हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी कठोर कायदा करा !

राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर यांची मागणी

‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये हिंदु देवतांचे विडंबन झाल्याचे प्रकरण

बिदर (कर्नाटक), २० जानेवारी (वार्ता.) – ‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान आणि विटंबना केली आहे. या वेब सिरीजवर बंदी घालावी, तसेच हिंदु धर्माचा अवमान करणे, देवतांचे विडंबन, साधू-संतांच्या हत्या यांच्या विरोधात कठोर कायदा केंद्र आणि राज्य येथे पारित करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, तांडव वेब सिरीजवर बंदी घालावी, अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी केली; मात्र ही मागणी केवळ भाजपच्या नेत्यांनी करणे हिंदूंना अपेक्षित नसून हिंदु धर्मियांच्या मतावर निवडून आलेल्या नेत्यांनीही या विरोधात आवाज उठवणे अपेक्षित आहे. हिंदु धर्मियांच्या मतावर निवडून येऊन हिंदूंच्या भावनांचा आदर करून त्यांच्या बाजूने बोलत नसाल, तर मी तुमचा निषेध करतो. भारत हा हिंदूबहुल देश आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदीची मागणी करावी.