(म्हणे) ‘शहराचे नाव पालटून तेथील वातावरण बिघडवू नका !’ – बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्यावर कुणाच्या भावना दुखावल्या जाण्याला आणि वातावरण बिघडायला ते औरंगजेबाचे वंशज आहेत का ?

बाळासाहेब थोरात

मुंबई – जरी शहराचे नाव पालटले, तरी लोकांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो ? काय फरक पडतो ? एखाद्या शहराचे, परिसराचे नाव पालटून तेथील वातावरण बिघडवू नका, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याला असलेला विरोध प्रकट केला. (प्रश्‍न केवळ नामांतराचा नाही, तर महाराष्ट्रावर अत्याचार करणार्‍या एका आक्रमणकर्त्याचे नाव देण्याचा आहे. ज्याला आपल्या मातृभूमीचा आणि छत्रपती संभाजी राजे यांचा अभिमान नाही, अशी व्यक्तीच असे वक्तव्य करू शकते. लांगूलचालनासाठी मुसलमानांपुढे पायघड्या घालणारी काँग्रेस आणि तिचे बगलबच्चे यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार ? – संपादक)

या वेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘उत्तम काम कसे होऊ शकते, याचा आदर्श महाविकास आघाडीने घालून दिलेला आहे. औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करणे, हा किमान समान कार्यक्रमाचा भागही नाही. त्यामुळे अशा प्रकारांना आमचा पहिल्यापासून विरोध आहे. छत्रपती संभाजी महाराज आमचेही आदर्श आहेत. सर्वांचेच श्रद्धास्थान आहेत; परंतु याप्रकरणात सामाजिक तेढ वाढू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. खरेतर जिथे सरकारी डिपार्टमेंट काम करते, तिथे अशा प्रकारची चूक होता कामा नये. (सरकारी कामाचा दाखला देणार्‍यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे महाराष्ट्र आहे; नाहीतर कधीच सुंता झाली असती’, याची तरी जाण ठेवावी. – संपादक)