आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असणारी देवद आश्रमातील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

चि. ऋग्वेदी गोडसे

देवद (पनवेल), ५ डिसेंबर (वार्ता.) – येथील सनातनच्या आश्रमात रहाणारी, उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असणारी चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ५ डिसेंबर म्हणजे कार्तिक कृष्ण पक्ष पंचमी या दिवशी फलकाद्वारे घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे त्या दिवशी तिचा ५ वा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच फलकाद्वारे मिळालेली आनंदवार्ता पाहून तिची आई सौ. मेधा गोडसे आणि वडील श्री. अतुल गोडसे यांसह आश्रमातील सर्वच साधकांना अत्यानंद झाला. अकलूज येथील तिची आजी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आशा गोडसे यांनाही हे वृत्त समजल्यावर त्यांनी परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यानंतर सनातनच्या संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी चि. ऋग्वेदी आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. या वेळी पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी तिची गुणवैशिष्ट्ये सांगितली. ती ऐकतांनाही ऋग्वेदी पुष्कळ स्थिर आणि साक्षीभावात असल्याचे जाणवत होते.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी चि. ऋग्वेदी हिला भेटवस्तू दिली. या वेळी तिच्या आई-वडिलांनीही तिच्या गुणांविषयी सांगितले. ऋग्वेदीच्या साधनेसाठी सातत्याने प्रयत्नरत रहाणार्‍या तिच्या आई-वडिलांचेही पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी कौतुक केले.

चि. ऋग्वेदी सतत आनंदी आणि उत्साही असते. उत्तम निरीक्षणक्षमता, ईश्‍वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि जिज्ञासू वृत्ती असे अनेक दैवी गुण ऋग्वेदीमध्ये आहेत.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

१. आध्यात्मिक प्रगतीची गती : वर्ष २०१६ मध्ये चि. ऋग्वेदीची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. आता वर्ष २०२० मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे. यावरूनच लक्षात येते की, तिच्या आध्यात्मिक प्रगतीची गती पुष्कळ आहे.

२. स्वच्छता सेवा सराईतपणे करणे : ऋग्वेदी साडेतीन वर्षांची असतांना एकदा ती स्वच्छता सेवेला आली होती. तेव्हा स्वच्छतेचे कापड धरणे आणि वस्तू पुसणे या कृती ती अगदी सराईतपणे करत होती. ‘जणू त्याविषयी तिला आधीपासूनच ठाऊक आहे’, असे वाटत होते.

३. मायेपासून अलिप्त असून आश्रमजीवनाशी समरस होणे : तिला मायेची ओढ नाही. ती आश्रमात रहाते; मात्र तिला आवडीनिवडी नाहीत. अन्य मुलींप्रमाणे ‘नटूया, वेगळे अलंकार घालूया’, असेही तिला वाटत नाही. खाण्या-पिण्याचीही तिला आवड नाही. ‘आई-बाबाही सतत समवेत हवेत’, असेही ती म्हणत नाही. आई-बाबा सेवेत व्यस्त असल्यास ती साधकांसमवेतही रहाते. ती आश्रमजीवनाशी समरस झाली आहे.

४. आश्रमाप्रतीची ओढ : आश्रमात रहायला येण्यापूर्वी ती आश्रमाच्या शेजारील संकुलात रहायची, तेव्हा ती मला संपर्क करून विचारायची, ‘‘मी आश्रमात कधी येऊ ? मला रहायला खोली कधी मिळेल ?’’