कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार उपस्थितांची संख्यामर्यादा हवी – उच्च न्यायालय

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लग्नसोहळे

मुंबई – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लग्नसोहळे आणि अंत्यसंस्कार यांमध्ये किती लोकांनी सहभागी व्हावे यासाठी घालून दिलेली संख्यामर्यादा ही अन्य कार्यक्रमांसाठी सरसकट लागू केली जाऊ शकत नाही. उलट कार्यक्रमाचे स्वरूप, कार्यक्रमस्थळाची क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार लोकांना छोट्या-मोठ्या कार्यक्रमांत सहभागी होण्यास अनुमती देणे योग्य होईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
एका याचिकेच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने वरील मत व्यक्त केले आहे.

सध्या लग्नसमारंभांत ५०, तर अंत्यसंस्कारात २० व्यक्ती सहभागी होण्यास अनुमती आहे.

या दोन्ही कार्यक्रमांचे स्वरूप वेगळे आहे. त्यामुळे त्यांची मर्यादा ही अन्य मोठ्या कार्यक्रमांसाठी लागू होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. सरकारच्या अधिसूचनांमध्ये मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमाची व्याख्या आणि त्यात सहभागी होणार्‍या व्यक्तींची कमाल संख्या नमूद नाही.