३९ टक्के लाचखोरीचा दर असलेला भारत आशिया खंडातील सर्वाधिक भ्रष्ट देश !

‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’चा धक्कादायक अहवाल

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना आणि नैतिकता न शिकवल्याचाच हा परिणाम होय ! प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा !

नवी देहली – लाचखोरीच्या संदर्भात आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात लाचखोरीचा दर ३९ टक्के आहे.

‘ग्लोबल करप्शन बैरोमीटर – एशिया’ या नावाने प्रकाशित आपल्या सर्वेक्षणात ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ने मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे पुढीलप्रमाणे –

१. जून ते सप्टेंबर या मासांत या संस्थेने १७ देशांमधील २० सहस्र लोकांना काही प्रश्‍न विचारले. त्यावर आधारित या सर्वेक्षणातील आकडे ठरवण्यात आले.

२. गेल्या १२ मासांमध्ये देशात भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे ४७ टक्के लोकांचे मत आहे, तर ६३ टक्के लोकांना वाटते की, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी सरकार चांगले काम करत आहे.

३. भारतात सरकारी सुविधांसाठी ४६ टक्के लोक हे वैयक्तिक ओळखीचा वापर करतात.

४. भारतानंतर सर्वाधिक लाचखोरी केली जाणार्‍या सूचीमध्ये कंबोडिया (३७ टक्के) आणि इंडोनेशिया (३० टक्के) या देशांचा क्रमांक लागतो.

५. मालदीव आणि जपान या देशांमध्ये लाचखोरीचा दर केवळ २ टक्के असून संपूर्ण आशियात हा सर्वांत अल्प आहे. विशेष म्हणजे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने या सर्वेक्षणात पाकिस्तानचा समावेश केलेला नाही.

६. सरकारी सेवांमधील भ्रष्टाचारामुळे सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागते, असे सर्वेक्षणात प्रत्येक ४ लोकांमागे ३ लोकांचे म्हणणे आहे, तर ३ लोकांमागे प्रत्येकी १ जण आपला लोकप्रतिनिधी भ्रष्ट असल्याचे मानतो.