कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण विभागात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन

नवी मुंबई – शासनाच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागाने पाचही जिल्ह्यांत आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियोजन केले आहे. राज्यात प्रथमच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन करण्यात आली आहे. या ‘वॉर रूम’साठी १८००२ ६७८४६६ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. या वॉर रूममधून सामान घेऊन येणार्‍या गाड्या ‘ट्रॅक’ केल्या जातील. गाड्या ज्या ठिकाणाहून निघतील, तेथून बाजार समितीपर्यंत येईपर्यंत जी.पी.एस्.द्वारे माहिती ठेवण्यात येईल. यामुळे बाजार समितीमधील गर्दी नियंत्रण आणि गाड्यांची आवक अगोदरच कळणे निश्‍चित होणार आहे. अशा पद्धतीचा प्रयोग कोकण विभागात प्रथमच होत आहे, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.

दौंड यांनी पुढे सांगितले की, २६ मार्चला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात एक उच्चस्तरीय अधिकार्‍यांची बैठक घेऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी आवश्यक ती उपाययोजना निश्‍चित केली. मुंबई शहर आणि उपनगरे यांसाठी लागणारे दूध, फळे, भाजीपाला पुरवठा सुरळीतपणे आणि किमान दरात उपलब्ध होण्यासाठी कार्यपद्धत निश्‍चित करण्यात आाली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय सुविधा पुरेशा मिळाव्यात, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मास्क, सॅनिटायझर, साबण, स्कॅनर आदींविषयी पुरेशी सिद्धता करण्यात आली आहे. आवश्यक बेड (खाटा) आणि वैद्यकीय सुविधा यांची अतिरिक्त सिद्धता झाली आहे.

कोकण विभागातील उद्योग क्षेत्रातील प्रमुखांची बैठक घेतली. गॅस, पेट्रोल, डिझेल, दूध, अत्यावश्यक साधने यांच्या निर्मितीचे प्रमुख, आयात-निर्यात करणारे व्यापारी आदी बैठकीला उपस्थित होते. विशेषत: अत्यावश्यक सेवेतील वाहनांना आवश्यक ते इंधन उपलब्ध होण्याविषयी काळजी घेण्यात यावी. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा चालू करण्याविषयी त्यांनी माहिती घेतली. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी कोणतीही अडचण आल्यास जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, अशी सूचना दौंड यांनी या वेळी केली.