व्यापार-उद्योगाला २ लाख कोटींचा फटका

कोरोनाचे दुष्परिणाम

कोल्हापूर – कोरोनामुळे देशांतर्गत बहुतांश उद्योग-व्यवसायातील उलाढाल ४० टक्क्यांनी थंडावल्याने देशातील उद्योग-व्यवसायांची अनुमाने २ लाख कोटी रुपयांची हानी झाल्याचे अनुमान ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (फिक्की) या शिखर व्यापारी संस्थेने काढले आहेत. यावर मात करण्यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याविषयीच्या शिफारशीही संस्थेने केल्या आहेत.

कोरोनाचा फटका रासायनिक उद्योग, इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग, आरोग्य, वित्तीय संस्था, वीज उत्पादक आस्थापन, खासगी सुरक्षा एजन्सी, सौर ऊर्जाक्षेत्र, किरकोळ व्यापार, क्रीडा यांसारख्या देशातील प्रमुख २२ हून अधिक घटकांना बसला आहे. यासाठी शासनाने आता साहाय्याची भूमिका घ्यावी, अशी भूमिका ‘फिक्की’ने केली आहे.