Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !

रशियाच्या आक्रमणात ४ भारतीय खलाशी ठार झाल्याचे प्रकरण

रशियाचे कार्यवाहक राजदूत व्लादिमीर लादानोव्ह (वर्तुळात)

नवी देहली – रशियाने युक्रेनच्या किनार्‍याजवळ ‘एम्व्ही गोल्डन लिओ’ या व्यापारी नौकेवर २१ जुलै या दिवशी क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात ४ भारतीय खलाशी ठार झाले. या घटनेनंतर भारताने रशियाचे कार्यवाहक राजदूत व्लादिमीर लादानोव्ह यांना बोलावून तीव्र निषेध नोंदवत रशियाकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

१. गिनी-बिसाऊचा (पश्चिम आफ्रिकेतील एका लहान देशाचा) ध्वज असलेली ‘एमव्ही गोल्डन लिओ’ ही मालवाहू नौका १९ जुलैला धान्य घेऊन युक्रेनच्या ओडेसा बंदरातून निघाली होती.

२. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या मालवाहू नौकेवर १७ कर्मचारी होते, ज्यांत ५ भारतियांचा समावेश होता. क्षेपणास्त्र आक्रमणात ४ भारतीय खलाशी ठार झाले, तर ५वा गंभीररित्या घायाळ झाला आहे.

३. युक्रेनमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पीडित व्यक्तींना सर्वतोपरी साहाय्य करत आहे.

४. युक्रेनच्या अधिकार्‍यांनी या आक्रमणासाठी रशियाला उत्तरदायी ठरवले आहे. युक्रेनच्या नौदलाने सांगितले की, मका घेऊन जाणारी ‘एम्व्ही गोल्डन लिओ’ ही नौका ओडेसा येथून निघाल्यानंतर काही वेळातच रशियाने त्यावर ३ ‘क्रूझ’ क्षेपणास्त्रे डागली. या आक्रमणानंतर नौकेला आग लागली.