तत्कालीन समाजवादी आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारांनी कब्रस्तानांच्या भिंतींवर पैसा खर्च करणे, हेच ‘धर्मनिरपेक्षता’ मानले ! – Yogi Adityanath

योगी आदित्यनाथ यांची टीका

योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या तत्कालीन सरकारांनी मंदिरे आणि विकासकामे यांकडे दुर्लक्ष केले. त्यांनी सार्वजनिक पैसा कब्रस्तानांच्या भिंतींवर खर्च करणे, म्हणजेच ‘धर्मनिरपेक्षता’ असे मानले, तर हिंदूंच्या धार्मिक स्थळांशी संबंधित प्रकल्पांना ‘धर्मांध’ ठरवले’, असा आरोप केला. बाराबंकी येथे ५४२ कोटी रुपयांच्या ८२ विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलतांना आदित्यनाथ यांनी हा आरोप केला.

ते पुढे म्हणाले की,

१. कब्रस्तानांसाठी संरक्षक भिंती बांधणे, हा धर्मनिरपेक्षतेचा निकष बनला होता. बाराबंकीतील महादेव मंदिर, अयोध्येतील श्रीराममंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिर यांच्याशी संबंधित प्रकल्पांना पाठिंबा नाकारला गेला; कारण असे करण्याला ‘धर्मांधता’ मानले जात होते.

२. भारताचे भविष्य सनातन धर्माच्या संवर्धनाशी अविभाज्यपणे जोडलेले आहे. आपले उज्ज्वल भविष्य सनातनच्या भक्कम पायावर आधारलेले आहे. जर सनातन धर्म सुरक्षित असेल, तर आपण सर्वजण सुरक्षित आहोत. जर सनातनला धोका निर्माण झाला, तर कुणीही सुरक्षित राहणार नाही.

३. राज्यात पूर्वी गुन्हेगार गावठी शस्त्रांच्या जोरावर व्यापार्‍यांमध्ये दहशत निर्माण करत असत. आता लक्ष्मणपुरीमध्ये अत्याधुनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्मिती होत आहे.

धर्मनिरपेक्षतेचे विकृत स्वरूप मुळापासून उखडा ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘मागील सरकारांनी कावड यात्रा, श्रीरामनवमीच्या मिरवणुका, जन्माष्टमीचे उत्सव आणि दुर्गा पूजेचे मंडप यांवर निर्बंध घालण्याला धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक मानले. जर भारत सुरक्षित रहायचा असेल, तर धर्मनिरपेक्षतेचे हे विकृत स्वरूप मुळापासून उखडून टाकले पाहिजे.’’