नेपाळमधील तरुण पुन्हा रस्त्यावर : बेरोजगारीच्या विरोधात संताप !

पंतप्रधान बालेन शहा यांच्या त्यागपत्राची मागणी

आंदोलन करतांना नेपाळमधील तरूण

काठमांडू (नेपाळ) – देशात तरुणांनी पुन्हा सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यास आरंभ केला आहे. गेल्या ३ दिवसांत ३ तरुणांनी स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यांपैकी दोघांचा उपचारांच्या वेळी मृत्यू झाला, तर एका तरुणाला गंभीर भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बेरोजगारीची समस्या सोडवू न शकणारे पंतप्रधान बालेंद्र शहा यांच्या त्यागपत्राची मागणी तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळी काँग्रेस या विरोधी पक्षाने सरकारवर तरुणांमध्ये आशा आणि विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आहे.

१. आंदोलकांनी पंतप्रधान बालेन शहा यांच्यावर जनविरोधी आणि निरंकुश पद्धतीने सरकार चालवल्याचा आरोप केला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, अर्थसंकल्प आणि धोरण यांत तरुणांचा रोजगार अन् उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.

२. नेपाळमध्ये सातत्याने समोर येत असलेल्या या घटनांनी तरुणांची मानसिक स्थिती, बेरोजगारी आणि सरकारी धोरणांविषयी गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांचे मत आहे की, जर सरकारने लवकर प्रभावी पावले उचलली नाहीत, तर विरोध अधिक तीव्र होऊ शकतो.

वर्ष २०२५ च्या आंदोलनाची आठवण

देशातील तरुण पुन्हा रस्त्यावर उतरल्याने सप्टेंबर २०२५ मध्ये तरुणांनी सरकारच्या विरोधात केलेल्या आंदोलनाच्या स्मृती ताज्या झाल्या आहेत. ९ सप्टेंबर २०२५ या दिवशी तरुणांनी संसद भवन कह्यात घेऊन तेथे गोंधळ घातला होता. त्यांनी सुरक्षा कर्मचार्‍यांची शस्त्रेही लुटली होती. या आंदोलनामुळे तेथील सरकार सत्ताच्युत झाले होते आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत बालेन शहा निवडून आले होते.

बालेन शहा यांचे पूर्वीचे वक्तव्य चर्चेत !

बालेन शाह

वर्ष २०२३ मध्ये तत्कालीन सरकारच्या धोरणांना विरोध करत प्रेम आचार्य या तरुणाने आत्मदहन केले होते. त्या वेळी शहा हे काठमांडू शहराचे महापौर होते. या आत्मदहनाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्यांनी ‘तरुणाने आत्मदहन करणे, हे सरकारचे अपयश आहे’, असे म्हटले होते. आता पंतप्रधान असलेले शहा यांनी तरुणांच्या आत्मदहनावर मौन बाळगले आहे. त्यामुळे आंदोलकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

संपादकीय भूमिका

आंदोलकांनी पंतप्रधान बालेन शहा यांच्यावर जनविरोधी आणि निरंकुश पद्धतीने सरकार चालवल्याचा आरोप केला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, अर्थसंकल्प आणि धोरण यांत तरुणांचा रोजगार अन् उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.