FIR Against PCS Officer : जिल्हा पुरवठा अधिकारी असलेली मुलगी ‘काळी कमाई’ करत असल्याची स्वतः आईचीच तक्रार !

  • महिला अधिकार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद

  • मुलगी जिवे मारण्याची धमकी देत असल्याचीही आईची तक्रार

सीमा चौधरी

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – हापूड येथे तैनात असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा चौधरी यांच्या विरोधात त्यांच्याच आईने तक्रार प्रविष्ट केली आहे. आई मुनेश रानी यांनी त्यांच्या मुलीवर फसवणूक, बनावट कागदपत्रे बनवणे, भूमी हडपण्याचा कट रचणे आणि स्वतःच्या बँक खात्यात काळ्या कमाईचे १५ लाख रुपये जमा करणे यांसारखे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर पोलिसांनी सीमा चौधरी यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

१. मुनेश रानी यांनी त्यांची मुलगी सीमा चौधरी यांच्यासह ५ जणांविरुद्ध पोलीस उपमहानिरीक्षकांकडे तक्रार केली आहे. त्यांनी तक्रारीमध्ये संजीव कुमार चौधरी, राजेंद्र राणा, गंभीर, नरेश कुमार आणि सीमा चौधरी यांना आरोपी म्हटले आहे. त्यांची मुलगी सीमा चौधरी आणि इतर आरोपी यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली असून त्यांची एक भूमाफिया टोळी आहे. ही टोळी भूखंड लाटते, असा आरोप त्यांनी केला आहे.

२. तक्रारीत म्हटले आहे, ‘संजीव कुमार आणि राजेंद्र राणा यांनी माझ्या बँक खात्यात मला न सांगता १५ लाख रुपये जमा केले. हे खाते गाझियाबाद येथील आयसीआयसीआय बँकेत माझी मुलगी सीमा चौधरी हिने उघडले होते आणि तिच हे खाते चालवत होती. खाते उघडतांना सीमा चौधरीने स्वतःचा ईमेल पत्ता वापरला होता. सीमा चौधरी तिची ‘काळी कमाई’ माझ्या बँक खात्यात जमा करत होती. मला त्याची कल्पना नव्हती.’

३. तक्रारीमध्ये ‘आरोपी मला धमकावत असून मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे’, असेही मुनेश रानी यांनी नमूद केले आहे.

४. पोलीस उपमहानिरीक्षक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, त्यांच्याकडे मुनेश रानी यांनी तक्रार केली असून हे प्रकरण चौकशीसाठी पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आले आहे.

५. अन्वेषणानंतर सीमा चौधरी आणि अन्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सीमा चौधरी किंवा इतर अन्य आरोपी यांनी अजूनही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

संपादकीय भूमिका

भारतात भ्रष्टाचार करणार्‍यांना कुटुंबातून विरोध होत नाही, उलट त्यांच्या काळ्या कमाईचा कुटुंबीयही लाभ घेतात; म्हणून भ्रष्टाचार बोकाळतो. चौकशीअंती या प्रकरणी सत्य समोर येईलच; मात्र मुलगी भ्रष्टाचार करत असल्याची तक्रार करणारी अशी तत्त्वनिष्ठ आई सर्वत्र असल्यास भारतात भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हायला वेळ लागणार नाही !