राज्यात पशूपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणणार ! – देवेंद्र फडणवीस

मनोगत व्यक्त करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर – पशूसंवर्धन विभागाला केंद्रस्थानी ठेवून विकास वाढीची योजना सिद्ध करण्यात आली असून याद्वारे २५ टक्के विकास दर गाठण्याचा प्रयत्न आहे. यातून शेतीपूरक अर्थव्यवस्था निर्माण करत राज्यात पशूपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणता येईल आणि या प्रयत्नात ‘राज्य गोसेवा आयोगा’चे मोलाचे योगदान असेल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गोआधारीत अर्थव्यस्थेला चालना देण्यात येईल आणि यातून शेतकर्‍यांना संकटात खंबीरपणे उभे रहाण्याचे बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मनोगत व्यक्त करतांना ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा

राज्यशासनाचा पशूसंवर्धन विभाग आणि राज्य गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा-२०२६’च्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांसह अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्य गोसेवा आयोगाच्या त्रैवार्षिक कार्य अहवालाचे आणि ‘गोसेवा आयोग योजना’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. राज्यातील गोशाळांनी सिद्ध केलेल्या उत्पादनांसाठी ‘गोटेन ब्रँड’ या बोधचिन्हाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा यांनी प्रास्ताविकाद्वारे आयोगाच्या कार्याविषयी आणि ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’ची माहिती दिली. २२ जून ते ५ जुलै या कालावधीत पार पडलेल्या या यात्रेच्या काळात राज्यातील २५ जिल्ह्यांत प्रत्यक्ष भेटी देत अनुमाने ६ सहस्र किलोमीटरचा प्रवास करण्यात आला. १ सहस्रांहून अधिक गोशाळांचा सहभाग नोंदवण्यात आला, तसेच अनुमाने १५ सहस्र गोशाळा संचालक, गोसेवक, गोपालक आणि शेतकरी यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला.

        गोतस्करांवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्याचा निर्णय घेऊन राज्यात गोतस्करीला आळा घालण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले, तसेच ज्या वाहनांद्वारे वारंवार गोतस्करी घडते, त्या वाहनांची नोंदणी कायमस्वरूपी रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या प्रसंगी सांगितले.