साधकांवर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करणारे म्हार्दोळ, गोवा येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७७ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) !

‘२९.३.२०२६ या दिवशी श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७७ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. परशुराम प्रभुदेसाई आणि सौ. पूनम प्रभुदेसाई

१. श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७७ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. श्री. राजेंद्र नाईक (वय ६३ वर्षे), बोरी, फोंडा, गोवा.

१ अ १. साधकांच्या सेवेतील अडचणी सोडवल्याने साधकांना सेवा करतांना उत्साह जाणवणे : ‘गोवा येथे सनातन संस्थेच्या होणार्‍या कार्यक्रमांच्या वेळी ‘व्यासपीठ आणि ध्वनीक्षेपक व्यवस्था’ या सेवेचे दायित्व ५ साधकांना दिले होते. तेव्हा प्रभुदेसाईकाका आमचा समन्वय करत होते. आम्ही सर्व साहित्य एकत्र करून चारचाकी गाडीत (टेम्पोत) ठेवून कार्यक्रमस्थळी जात असू. त्या वेळी प्रभुदेसाईकाका आमच्या समवेत येत असत. ते आमच्या सेवेतील अडचणी सोडवत असत. त्यांच्यामधील प्रेमभावामुळे आम्हाला सेवा करतांना उत्साह जाणवत असे.

श्री. राजेंद्र नाईक

१ अ २. साधकांना सेवेतील चुका सांगून त्यांना सेवा परिपूर्ण  करायला उद्युक्त करणे : एखादा कार्यक्रम झाल्यावर काका आम्हाला आमच्याकडून झालेल्या चुका सांगत असत. त्यामुळे आम्हाला पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी चुका टाळता येत असत. ‘परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.’

१ आ. सौ. मीनाक्षी नाईक (वय ६० वर्ष ), बोरी, फोंडा, गोवा.

१ आ १.  श्री. परशुराम प्रभुदेसाई आमची आमच्या नातेवाइकांपेक्षाही आपुलकीने विचारपूस करतात.

१ आ २. साधिकेच्या यजमानांच्या हृदयाचे शस्त्रकर्म  झाल्यावर तिला स्वतःच्या घरातील खालच्या माळ्यावरील जागा देण्याची तयारी दर्शवणे : माझ्या यजमानांचे (श्री राजेंद्र नाईक यांचे) ४ वर्षा पूर्वी  हृदयाचे शस्त्रकर्म  (बायपास साजरी) झाले. त्या वेळी आम्ही तिसर्‍या माळ्यावर एका सदनिकेत रहात होतो. यजमानांचे शस्त्रकर्म  झाल्यामुळे ते जिन्याच्या पायर्‍या चढून जाऊ शकत नव्हते. त्या वेळी प्रभुदेसाईकाकांनी मला प्रेमाने सांगितले, ‘‘म्हादोळचे घर हा आश्रम आहे. तेथे खालच्या माळ्यावर तुम्ही राहू शकता.’’ मला त्यांच्या बोलण्यातून पुष्कळ आपुलकी आणि जिव्हाळा जाणवला. त्यामुळे माझ्या मनावरील दडपण नाहीसे झाले. नंतर गुरुदेवांच्या कृपेने आमची एका ठिकाणी रहाण्याची सोय झाली.

१ आ ३. साधिकेकडून समष्टी सेवा करून घेणे आणि तिला सेवेतील आनंद देणे : पूर्वी माझी शारीरिक स्थिती चांगली नव्हती. मला हातात लेखणीही धरता येत नव्हती. त्यामुळे मला लिहायला अडचण येत होती. एकदा प्रभुदेसाईकाकांनी मला मडगाव येथील एका कार्यक्रमात स्वागतकक्षावर कार्यक्रमाला आलेल्या व्यक्तींची नावे लिहिण्याची सेवा करायला सांगितली. मी त्यांना माझी अडचण सांगितली. तेव्हा ते मला प्रेमाने म्हणाले, ‘‘तुम्ही कार्यक्रमाला आलेल्या व्यक्तींना ‘स्वागतकक्षावर नाव नोंदणी करा’, असे सांगू शकता ना ?’’ तेव्हा मी ती सेवा स्वीकारली. त्या वेळी त्यांनी मडगाव येथील एका साधकाला माझ्या शारीरिक स्थितीविषयी सांगितले होते. ते साधक मधून मधून माझी विचारपूस करत होते. ते मला ‘सेवा करतांना अडचण येत नाही ना ?’, असे विचारत होते. ‘माझी क्षमता नसतांना गुरुदेवांनी प्रभुदेसाईकाकांच्या माध्यमातून माझ्याकडून समष्टी सेवा करून घेतली आणि मला सेवेतील आनंद दिला’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

२. सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. सौ. मीनाक्षी नाईक

सौ. मीनाक्षी नाईक

२ अ १. प्रेमभाव : ‘सौ. पूनम प्रभुदेसाई या आमच्यावर आईप्रमाणे प्रेम करतात. आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर त्या आमच्याशी प्रेमाने बोलतात. त्या प्रतिवर्षी आम्हाला आंबे आठवणीने पाठवतात.

 २ अ २. व्यवस्थितपणा : अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी काही साधक व्यासपिठावरील वक्त्यांना पाणी देण्याची सेवा करतात. सौ. प्रभुदेसाईकाकू त्या साधकांना साहाय्य करतात. या सेवेसाठी जे साहित्य लागते, ते सर्व साहित्य काकू एका खोक्यात व्यवस्थित ठेवतात. त्यामुळे नंतर कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळी त्यांना साहित्य मिळवण्यासाठी अडचण आली नाही.’

२ आ.  श्री. राजेंद्र नाईक आणि सौ. मीनाक्षी नाईक

२ आ १. सर्वांना प्रेमाने आपलेसे करणारे प्रभुदेसाई कुटुंबीय ! : ‘श्री. परशुराम प्रभुदेसाई आणि सौ. पूनम प्रभुदेसाई यांच्याप्रमाणेच त्यांची तीनही मुले (सौ. आरती कामत, सौ. स्नेहा नाडकर्णी, श्री. गिरिजय प्रभुदेसाई ) सर्वांना आपलेसे करतात. एकदा आमचा अपघात झाला. तेव्हा माझ्या (श्री. राजेंद्र नाईक यांच्या) उजव्या पायाला थोडे लागले होते. तेव्हा प्रभुदेसाई कुटुंबीय त्यांच्या नातेवाइकाच्या लग्नासाठी मडगाव येथे गेले होते. नंतर ते सर्व जण घरी जात असतांना आमच्या घरी आले. त्यांनी आमची प्रेमाने विचारपूस केली. त्या वेळी ‘गुरुदेवच आमची विचारपूस करत आहेत’, असे वाटून आमची भावजागृती झाली. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रभुदेसाई कुटुंबियांच्या माध्यमातून आम्हाला ‘साधक कुटुंब कसे असते !’, हे अनुभवायला दिले’, त्याबद्दल आम्ही गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ८.६.२०२६)