प्रस्तावित पशूवधगृहाच्या भूमीची मोजणी तातडीने स्थगित करण्याची नागरिकांकडून मागणी !

तळोजा येथे ठाकरे गट आक्रमक !

ए आय निर्मित चित्र      पनवेल – तालुक्यातील मोवे वाजे (तळोजा एम्.आय.डी.सी.) येथे प्रस्तावित असलेल्या पशूवधगृहाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले आहेत. या प्रस्तावित प्रकल्पाच्या भूमीच्या मोजणी प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवत पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन ही मोजणी तातडीने स्थगित करण्याची मागणी केली आहे. स्थानिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट मोजणीच्या नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप या वेळी करण्यात आला आहे. हा प्रकल्प श्री स्वामी समर्थ मठ आणि मंदिर यांच्या परिसरात येत असल्याने भाविकांमध्येही मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

स्थानिकांच्या मते हा परिसरातील नागरिक आधीच सिडको डम्पिंग ग्राउंड (कचरा साठवण्याची जागा), मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आणि गाढी नदीचे प्रदूषण यांमुळे त्रस्त असून या सर्वांमुळे येथील भूजल आणि विहिरी यांचे पाणी दूषित झाले आहे. अशा परिस्थितीत येथे पशूवधगृह उभारल्यास तीव्र दुर्गंधी, पर्यावरणीय प्रदूषण आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, तसेच लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी या पशूवधगृहाला आणि भूमी मोजणीला तीव्र विरोध करण्याची ठाम चेतावणी दिली आहे.

संपादकीय भूमिका

नागरिकांनी पशूवधगृहाला केलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन त्याला कायमची स्थगिती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला पाहिजे !