जो कुणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे !

श्रीराममंदिरातील दान चोरीवर रा.स्व. संघाने प्रथमच मांडली भूमिका !

संघाचे सरकार्यवाह (महासचिव) श्री. दत्तात्रेय होसाबळे

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दानपेट्यांमधून निधीची चोरी होणे दुर्दैवी आहे. यामुळे रामभक्तांच्या भावना आणि श्रद्धा यांना धक्का बसला आहे. विशेष अन्वेषण पथकाच्या अन्वेषणात जो कुणी दोषी आढळेल, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका या प्रकरणात रा.स्व. संघाने प्रथमच उघडपणे मांडली.

हिंदुत्वविरोधी शक्तींचे आणि समाजाला अपकीर्त करू पहाणार्‍यांचे षड्यंत्र हाणून पाडा !

संघाचे सरकार्यवाह (महासचिव) श्री. दत्तात्रेय होसाबळे म्हणाले की, रामभक्तांचा दीर्घ संघर्ष, समर्पण आणि त्याग यांतून श्रीराममंदिर उभारले गेले. आज ते हिंदु समाजासाठी श्रद्धेचे एक प्रमुख केंद्र आहे. येथील दानपेटीतील पैशांच्या चोरीच्या घटनेमुळे आम्ही सर्व दुःखी झालो आहोत. न्यासाच्या विनंतीनुसार उत्तरप्रदेश सरकारने एक विशेष अन्वेषण पथक स्थापन करून चौकशी चालू केली आहे. चौकशीत जो कुणी दोषी आढळेल, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.

न्यास आता व्यवस्थापन आणि कामकाज यांतील सर्व त्रुटी दूर करेल, अशी आशा !

श्री. दत्तात्रेय होसाबळे पुढे म्हणले की, हिंदु समाज आणि रा.स्व. संघ यांना आशा आहे की, न्यास या गंभीर घटनेची नोंद घेऊन व्यवस्थापन आणि कामकाज यांतील सर्व त्रुटी दूर करेल, जेणेकरून मंदिरावरील रामभक्तांची श्रद्धा कायम राहील. सध्याचा गोंधळ आणि संदिग्धता संपुष्टात आली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व हिंदूंना या कठीण काळात संयम आणि धैर्य राखण्याचे आवाहन करत आहे. या दुर्दैवी घटनेचा अपलाभ घेऊन हिंदुत्वविरोधी शक्ती आणि समाजाला अपकीर्त करू पहाणारे घटक यांचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे.