(म्हणे) ‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही, विशिष्ट वर्गाने थोपवलेल्या गोष्टी !’ – शरद पवार

  • जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाविषयी शरद पवारांचे आक्षेपार्ह विधान !

  • वारकरी संप्रदायातून तीव्र संताप !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले शरद पवार

पिंपरी-चिंचवड – आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही. असे म्हणणे म्हणजे एका विशिष्ट वर्गाने आपली कृत्ये लपवण्यासाठी थोपवलेल्या गोष्टींना खरे मानण्यासारखे होईल, असे विधान आकुर्डी येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षाच्या पार्श्वभूमीवर केले. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

ऐन आषाढी एकादशी आणि पालखी सोहळ्याच्या पवित्र वातावरणात महाराष्ट्राचे आराध्यदैवत अन् संतांची परंपरा यांवर केलेल्या या चिखलफेकीमुळे वारकरी संप्रदायातून तीव्र अप्रसन्नता व्यक्त करण्यात आली असून संतापाची लाट उसळली आहे. ‘राजकीय स्वार्थासाठी संतांचा इतिहास आणि वारकर्‍यांची अस्मिता यांची मोडतोड थांबवा’, अशी चेतावणी वारकरी संघटनांनी दिली आहे.

संतांचे विचार शरद पवार यांना मान्य नाहीत ! – आचार्य तुषार भोसले, प्रदेशाध्यक्ष, भाजप आध्यात्मिक आघाडी

आचार्य तुषार भोसले

शरद पवार यांना हिंदु संत आणि त्यांचे विचार मुळात मान्यच नाहीत. जगद्गुरु तुकोबांसह अन्य समकालीन संतांचे त्यांच्या वैकुंठगमनाचे अभंग असतांना त्यावर प्रश्न उपस्थित केला नाही, तर ते शरद पवार कसले ? पण त्यांनी मान्य-अमान्य करून काही उपयोग नाही; कारण महाराष्ट्रातील लाखो वारकरी ३७५ वर्षांपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन मान्य करतात आणि जोवर चंद्र-सूर्य आहेत, तोवर हे सत्य अशा ऐर्‍या-गैर्‍यांच्या बरळण्याने पालटणार नाही.

शरद पवार यांनी या विधानानंतर स्वत:च्या अधिकृत फेसबुक पोस्टवर समर्थन करतांना जगद्गुरु तुकोबारायांच्या ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या अभंगाचा संदर्भ दिला. (संतांच्या नावाखाली स्वतःचा हिंदूविरोधी कार्यक्रम राबवणार्‍या राजकारण्यांना वारकरी संप्रदायाचे दैवी तत्त्वज्ञान पुरून उरेल ! – संपादक)

प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी केविलवाणी धडपड ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, वारकरी पाईक संघ

ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

एखादी गोष्ट हेतूपुरस्सर, तसेच चुकीच्या दृष्टीने समाजासमोर मांडणे, याला शास्त्रामध्ये ‘प्रमाद’ नावाचा दोष असे म्हणतात. संपूर्ण राजकीय कारकीर्द आणि पक्ष यांची वाताहत झाल्यानंतरही येनकेन-प्रकारेण स्वत: प्रसिद्धीच्या झोतात राहिलो पाहिजे, यासाठीची ही केविलवाणी धडपड आहे. समाजात तेढ निर्माण होणे, हेच त्यांचे आजपर्यंतचे भांडवल आहे. हा काही त्यांचा पहिला प्रयत्न नाही. त्यांच्या सर्व प्रयत्नांना वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान पुरून उरणार आहे.

संपादकीय भूमिका

  • स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्‍यांना हिंदु संतांचे अलौकिकत्व पचत नसल्यानेच ते वारंवार अशी विधाने करत आहेत, हे आता उघड झाले आहे. वारकरी संप्रदायाने अशांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे !
  • आध्यात्माचा काडीचा अभ्यास नसणार्‍यांना वैकुंठगमनासारख्या अत्युच्च पातळीची स्थिती काय कळणार ?