ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ५ गोवंशियांची सुटका !

राजापूर तालुक्यात गोवंशियांची वाढती अवैध वाहतूक !

राजापूर –  तालुक्यातून अनेक वेळा गोवंशियांची अवैध वाहतूक केली जात असल्याच्या घटना घडतच आहेत; मात्र आता स्थानिक ग्रामस्थच सतर्क होत असल्यामुळे २० जूनच्या रात्री अवैध वाहतूक होत असलेल्या ५ गोवंशियांची सुटका करण्यात यश आले आहे.

१. तालुक्यातील परटवली येथून करक-कारवली रिंग रस्तामार्गे अणुस्कुरा तपासणी नाका चुकवत कोल्हापूरच्या दिशेने ५ गोवंशियांची अवैध वाहतूक एका टेम्पोतून केली जात होती.

२. पहाटेच्या वेळी संशयास्पद वाहनाचा आवाज ग्रामस्थांच्या कानावर पडला. त्यानंतर एकमेकांशी संपर्क करून परिसरातील तरुणांनी एकत्रितपणे या टेम्पोचा पाठलाग केला; मात्र टेम्पोच्या पुढे असलेल्या चारचाकी वाहनातून संशयित एजंट पसार झाला.

३. टेम्पोत गोवंशियांना कोणत्याही प्रकारच्या चारा-पाण्याची सोय न करता अत्यंत दाटीवाटीने आणि अमानुष पद्धतीने बांधण्यात आले होते.

४. पकडलेला टेम्पो रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या कह्यात देण्यात आला. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

जी माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या आणि गोवंशियांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवणार्‍या पोलिसांना का मिळत नाही ?