भूमीवर आसन ठेवून जेवायला का बसावे ?

आयुर्वेद सांगतो, ‘जेवतांना शांतपणे आणि प्रसन्न जागी बसून जेवावे.’ मांडी घालून बसण्याच्या पारंपरिक भारतीय पद्धतीमुळे आपण प्रमाणात आणि नीट चावून चावून खातो, हे त्यामागील शास्त्र होय. उभे राहून खाणार्‍या व्यक्ती बहुतांशी आरोग्यास घातक पदार्थ (जंक फूड) अधिक मात्रेत आणि जलद गतीने खात असल्याने अपचनापासून अगदी श्वास लागण्यासारख्या कित्येक गंभीर विकारांपर्यंतच्या त्रासांना निमंत्रण देत असतात. उभे राहून खातांना आपल्या पचनसंस्थेशी संबंधित अवयव योग्य स्थितीत नसणे, हेही आरोग्याच्या समस्या निर्माण करणारे महत्त्वाचे कारण आहे. (साभार : जर्नल ऑफ द ॲकेडमी ऑफ न्युट्रीशन अँड डायटिक्स)

टेबल-खुर्चीच्या वापरापेक्षा भूमीवर आसन ठेवून त्यावर मांडी घालून बसणे, ही जेवणाची आदर्श स्थिती आहे. येता-जाता उभ्या उभ्याने जेवण्यासाठी आपण काही घोड्यासारखे प्राणी नाही, हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मूर्खांची लक्षणे सांगत असतांना समर्थ रामदासस्वामी ‘मार्गें जाय खात खात । तो येक मूर्ख ॥’ असे का म्हणतात ? त्यामागे हे कारण दडलेले आहे, इतके जरी आम्ही लक्षात घेतले, तरी कित्येक आरोग्य समस्यांपासून दूर रहाणे सहज शक्य आहे.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.