दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला

दवर्ली आणि सां जुजे द आरियल नेसाई या ग्रामपंचायतींची कार्यवाही

श्री. प्रसाद नमशीकर, वार्ताहर, दैनिक ‘सनातन प्रभात’

गोवा येथील कचरा समस्या !

मडगाव, १३ जून (वार्ता) – मुगाळी, मडगाव येथील रस्त्याच्या बाजूला गेली अनेक वर्षे प्लास्टिकच्या पिशव्यांमधून कचरा टाकला जात होता. त्यामुळे येथे कचरा साठला होता. हा कचरा रस्त्यावर पोचला होता. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. प्रसाद नमशीकर यांनी दवर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सां जुजे द आरियल, नेसाई ग्रामपंचायतीचे सरपंच यांची भेट घेऊन त्यांना समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यावर स्थानिक ग्रामपंचायतींनी तातडीने निर्णय घेत हा परिसर पूर्णपणे स्वच्छ केला आहे.

मुगाळी येथे टाकलेला कचरा (२२ मार्च २०२६)
मुगाळी येथील कचरा हटवल्यानंतरचा परिसर (११ जून २०२६)

मुगाळी हा भाग दवर्ली आणि सां जुजे द आरियल, नेसाई या दोन ग्रामपंचायतींच्या सीमेत येतो. सीमेवरील भाग असल्यामुळे या ठिकाणी गेली अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा साचत होता. या रस्त्याच्या जवळच श्री अयप्पा मंदिर आहे. ग्रामपंचायतींनी यापूर्वी अनेकदा या ठिकाणचा कचरा हटवून जागा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र काही बेशिस्त नागरिक वारंवार याच ठिकाणी कचरा टाकत राहिले. पंचायतीने सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे काही जणांना दंडही ठोठावला; परंतु नागरिक दंड भरूनही पुन्हा त्याच जागी कचरा टाकत असल्याने ही समस्या उग्र बनली होती. (विदेशातील स्वच्छतेचे कौतुक करणारे भारतातील नागरिक हे लक्षात घेत नाहीत की, तेथील स्वच्छता ही केवळ तेथील प्रशासनाच्या सतर्कतेमुळे नाही, तर नागरिक स्वतःही तेवढेच शिस्तबद्ध आणि सतर्क असतात. भारतातील नागरिकांना शिस्त लागेल, तेव्हाच येथील कचरा समस्या सुटेल. – संपादक)

हे ही पहा →

एका दृष्टिक्षेपात . . . 

गोवा कचऱ्याच्या विळख्यात !

कचर्‍याची ही भीषण समस्या पाहून ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. प्रसाद नमशीकर यांनी पंचायतींच्या लोकप्रतिनिधींची भेट घेतली. या वेळी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या अडचणी मांडताना सांगितले की, पंचायतीला मिळणारे अपुरे आर्थिक साहाय्य आणि ठोस निर्णय घेण्याचे अधिकार नसणे, यांमुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे कठीण जात आहे. त्यावर वार्ताहराने ‘या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत समस्या मांडली आहे का ?’, अशी विचारणा केली. या चर्चेला सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मुगाळी येथील रस्त्याकडेचा कचरा हटवून जागा स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही दिवसांतच मुगाळी येथील कचर्‍याने भरलेली ती जागा पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली आहे. तिथे पुन्हा कचरा टाकला जाऊ नये, यासाठी पंचायतीने ‘येथे कचरा टाकू नये,’ या आशयाची स्पष्ट चेतावणी देणारा फलक त्या ठिकाणी लावला आहे. त्याचप्रमाणे कचरा टाकणार्‍यांवर कडक लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना पकडून दंड करण्यासाठी तिथे एका स्वतंत्र सुरक्षारक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. प्रसाद नमशीकर यांनी केलेल्या योग्य प्रबोधनामुळे आणि लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हा परिसर सध्यातरी कचराकुंडीतून मुक्त झाला आहे. या कौतुकास्पद निर्णयाविषयी दोन्ही ग्रामपंचायतींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

याचप्रमाणे फोंडा येथील अंत्रुजनगर आणि धारगळ, पेडणे येथे उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा संबंधित ग्रामपंचायतींनी उचलला असल्याचे १२ जून या दिवशी लक्षात आले.