झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई आणि ठाणे महापालिकांना सुनावले !

मुंबई – मुंबई आणि ठाणे येथील झाडांभोवतीचे सिमेंट-काँक्रिटीकरण न हटवल्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही महापालिकांच्या कारभारावर खेद व्यक्त केला. ‘झाडे किती आवश्यक आहेत, हे सांगण्याची आवश्यकता नाही; परंतु झाडांच्या संवर्धनाविषयी आपल्याकडे कायदा आणि न्यायालयाचे आदेश असूनही कार्यवाहीचे आदेश केवळ कागदावरच आहेत. झाडांच्या संवर्धनाच्या संदर्भात असाच निष्काळजीपणा चालू राहिल्यास भावी पिढीसाठी मोठ्या प्रमाणात रुग्णालये बांधण्याची वेळ आपल्यावर येईल’, अशा शब्दांत न्यायालयाने दोन्ही महापालिकांना सुनावले. सिमेंट आणि काँक्रिटीकरणामुळे वृक्ष कोसळतात, तसेच पर्यावरणीय हानीही होते. यासंदर्भात चिंता व्यक्त करणार्‍या जनहित याचिकेची न्यायालयाने सुनावणीच्या वेळी गंभीर नोंद घेतली. या वेळी अधिकार्‍यांसह यासंदर्भातील पहाणी करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

संपादकीय भूमिका

असे सुनवावे का लागते ? महानगरपालिका झाडांचे संवर्धन आणि संरक्षण का करत नाही ? या कामात निष्क्रीय असणार्‍या संबंधितांवरही कारवाई व्हायला हवी !