ईश्वरपूर (जिल्हा सांगली) बसस्थानकावर अपुर्‍या फलाटांमुळे प्रवाशांचे हाल !

श्री. भीमराव खोत, पलूस

सांगली जिल्ह्यातील हे आहे ‘ईश्वरपूर’ महत्त्वाचे बसस्थानक

ईश्वरपूर, १३ जून (वार्ता.) – सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर हे महत्त्वाचे बसस्थानक आहे. या बसस्थानकावर फलाटांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे वारणानगर, कोडोली, आष्टा, ताकारी, विटा, जुनेखेड, तासगाव आणि पलूस या मार्गांवरील बसगाड्या फलाटावर न थांबवता शेड नसलेल्या ठिकाणी थांबवल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना रणरणत्या उन्हात या मार्गावरील गाड्यांची वाट पहात थांबावे लागते.

रखरखत्या उन्हात नारळाच्या झाडाच्या सावलीचा आधार घेऊन गाड्यांची वाट पहाणारे प्रवासी

पावसाळ्यातही प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. त्यामुळे ‘कुठली गाडी नेमकी कुठे लागणार ?’ असाही प्रश्न प्रवाशांना पडल्यामुळे त्यांची गैरसोय होते. गाडीची जागा पालटली, तर सामान घेऊन प्रवाशांना तिथे धावावे लागते. येथे प्रवाशांना ऊन लागू नये, म्हणून ना तात्पुरत्या छताची व्यवस्था करण्यात आली आहे, ना बसण्याची. त्यामुळे महिला, आबाल-वृद्ध, आजारी या प्रवाशांचीही गैरसोय होते. तेथील नारळाच्या झाड्याच्या थोड्या सावलीचा आधार घेऊन प्रवासी गाड्यांची वाट पहात थांबतात; परंतु प्रवाशांना होत असलेल्या या अडचणीकडे बस प्रशासनाचे मात्र पूर्ण दुर्लक्ष होत आहे.

१. बसस्थानकावरील प्रसाधनगृह अत्यंत अस्वच्छ आहे. येथे जायचे असेल, तर अक्षरश: नाक मुठीत धरून जावे लागते. त्यामुळे काही प्रवासी बसस्थानकाच्या परिसरात आडोशाच्या ठिकाणी लघुशंका करतात. येथील लाद्याही तुटलेल्या आहेत.

प्रसाधनगृहाची दुरवस्था

२.  बसस्थानकाच्या परिसरात अन्यत्र गवत वाढले आहे. बसस्थानकातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण अपूर्ण आहे. बसस्थानकाच्या अर्ध्या भावार मुरुम टाकलेला आहे. त्या भागात अनेक खड्डे आहेत. काही भागात झुडपे वाढली आहेत.

बसस्थानकावर वाढलेली झुडपे

३. ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने ईश्वरपूर आगार व्यवस्थापक श्री. दिलीप ठोंबरे यांची भेट घेऊन त्यांना प्रवाशांना येणार्‍या अडचणींविषयी विचारले असता त्यांनी ‘त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे सांगितले.

सकारात्मक गोष्टी

येथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे. बसगाड्यांच्या वेळापत्रकांचा फलक, विविध योजनांचे फलक लावलेले आहेत. हिरकणी कक्ष आणि कर्मचारी विश्रांती कक्ष यांची स्थिती चांगली आहे. स्थानकातील बसगाड्यांची स्थितीही चांगली आहे.

-बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह पाठवा !

आपल्या भागातील बसस्थानकेही अस्वच्छ असल्यास, पिण्याचे पाणी, बसण्यासाठीची बाकडी, कचराकुंड्या अशा किमान सुविधाही नसल्यास, बसस्थानकांच्या अशा दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह ‘सनातन प्रभात’साठी ‘९२२५६३९१७०’ या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य करा !


हे वाचा → SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !


नागरिकांना आवाहन !

‘बसस्थानकांची स्वच्छता’ हे जसे एस्.टी. महामंडळाचे दायित्व आहे, तसेच ‘सुजाण नागरिक’ म्हणून आपलेही दायित्व आहे. ‘एस्.टी. ही सर्वसामान्यांचा आधार आहे’, याची जाणीव ठेवून बसस्थानके स्वच्छ-सुंदर राखण्यासाठी प्रत्येक नागरिकानेही या अभियानामध्ये योगद्यान द्यावे.

सूचना नोंदवा !

वल्लभनगर येथील बसस्थानकाच्या दु:स्थितीविषयी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या  ‘https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Suggestions.aspx’ या लिंकवर ‘सनातन प्रभात’ने नोंदवली आहे. आपणही आपली सूचना त्वरित नोंदवा !