हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन ! 

१. चारचाकी गाडीने जात असतांना दृष्टी आकाशाकडे गेल्यावर एक अद्भुत दृश्य दिसणे आणि ढगांमधून सूर्याची किरणे प्रक्षेपित होत असतांना त्यात मारुतिरायाचे दर्शन होणे अन् मनाला वेगळाच आनंद जाणवणे  

‘२.४.२०२६ या दिवशी हनुमान जयंती होती. संध्याकाळी ५.२० वाजता मी फोंड्याहून मडगावच्या (गोवा) दिशेने चारचाकी गाडीने जात होतो. त्या दिवशी पावसाळी वातावरण होते. मी बोरी (गोवा) येथे पोचत असतांना माझी दृष्टी सहज आकाशाकडे गेली. तेव्हा मला आकाशात एक अद्भुत दृश्य दिसू लागले. ढगांमधून सूर्याची किरणे प्रक्षेपित होत होती आणि त्यामधून मला श्री मारुतिरायाचे दर्शन होऊ लागले. त्या वेळी माझ्या मनाला वेगळाच आनंद आणि उत्साह जाणवत होता. मी गाडी चालवत असूनही माझे लक्ष केवळ त्या अद्भुत दृश्याकडे खिळून होते.

२. ढगांमध्ये दिसणार्‍या मारुतिरायाची भ्रमणभाषमध्ये छायाचित्रे काढणे आणि त्या छायाचित्रातील दृश्य पाहून ‘श्री मारुतिराया येणार्‍या आपत्काळात साधकांचे रक्षण अन् वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी प्रगट होत आहेत’, असे जाणवणे 

श्री. संगम बोरकर

मी माझी चारचाकी गाडी बाजूला घेतली आणि ढगांमध्ये दिसणार्‍या मारुतिरायाची भ्रमणभाषमध्ये छायाचित्रे काढली. तेवढ्यात सूर्याचे किरण अधिक पसरू लागले आणि मला त्याकडे पहाणे कठीण होऊ लागले. मी काढलेली छायाचित्रे पाहिल्यावर त्यात श्री मारुतिरायांचा चेहरा दिसत होता. डोक्यावर मुकुट आणि त्यांच्या तोंडाकडे सूर्य दिसत होता. हे दृश्य पाहून माझ्या मनात ‘श्री मारुतिराया येणार्‍या आपत्काळात साधकांचे रक्षण आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी प्रगट होत आहे’, असा विचार आला.

‘हे मारुतिराया, येणार्‍या आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण होऊ दे. साधकांमध्ये दास्यभाव आणि भक्ती वृद्धींगत होऊन आम्हाला श्रीरामस्वरूप गुरुदेवांची सेवा अन् भक्ती करता येऊ दे आणि रामराज्याची स्थापना लवकर होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला आलेली अनुभूती मी त्यांच्या चरणी अर्पण करतो.’

– श्री. संगम प्रफुल्ल बोरकर, मडगाव, गोवा. (३.४.२०२६)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक