नियत, नीती आणि निर्णय यांमुळे देशाच्या विकासाला गती ! : PM Narendra Modi

(‘नियत’ म्हणजे हेतू किंवा उद्येश)

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – नियत, नीती आणि निर्णय यांमुळे भारताच्या विकासाला नवी गती मिळाली आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. नरेंद्र मोदी यांनी भारताचे सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून कार्यरत रहाण्याचा विक्रम प्रस्थापित केल्याच्या निमित्ताने ‘भारत मंडपम्’ येथे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. या वेळी त्यांनी गेल्या १२ वर्षांतील सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख केला.

पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘मला देशसेवेचे भाग्य लाभले अहे. हे यश माझे वैयक्तिक नसून देशवासियांचे, तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आहे. ‘विकसित भारत’ घडवण्यामागे सर्वांचे प्रयत्न, हीच प्रेरणाशक्ती आहे. राजकीय स्थैर्य आणि निर्णायक नेतृत्व, यांमुळे देशाने विकासाचा वेग पकडला.’’

काँग्रेसने तिच्या अपयशाचे खापर देशातील हिंदु समाजावर फोडले !

काँग्रेसच्या काळातील संथ गतीच्या आर्थिक वाढीला ‘हिंदु ग्रोथ रेट’ असे संबोधण्यात आले. खरे तर त्याला ‘काँग्रेस ग्रोथ रेट’, असे म्हणणे अधिक योग्य ठरले असते. काँग्रेसने तिच्या अपयशाचे खापर देशातील हिंदु समाजावर फोडले आणि देशाला असाहायता, दारिद्र्य आणि न्यूनगंड यांच्या गर्तेत ढकलले.