केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुस्तकात छत्रपती शिवरायांविषयी २० पानी धडा ! – दादा भुसे, शिक्षणमंत्री

पालटलेली पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार !

मुंबई – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी यांसह सहावीची पुस्तके पालटण्यात आली. ही पुस्तके बालभारतीने सिद्ध केली असून बालभारतीच्या हिरक महोत्सवी वर्षात प्रथमच एका वर्षात ४ इयत्तांची पुस्तके पालटण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना ही पुस्तके मिळतील.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकामध्ये यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य यांच्याविषयी केवळ दीड पानाचेच लिखाण होते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण विभागाकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवरायांविषयी २० पानांचा धडा समाविष्ट केला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आनंददायी, प्रयोगशील आणि अनुभवसमृद्ध करण्यावर या पुस्तकांमध्ये भर दिला आहे. भारतीय ज्ञान परंपरा, स्थानिक संदर्भ, विविध उपक्रम, संकल्पनाचित्रे आणि सारणी यांच्या माध्यमातून शिक्षण अधिक अनुभवाधारित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

छत्रपती शिवरायांचा इतिहास दीड पानावरून २० पानी करण्याचा शासनाचा स्तुत्य प्रयत्न ! शिवरायांसह अन्य राष्ट्रपुरुष किंवा क्रांतीकारक यांचाही इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न भविष्यात करायला हवा !