CM Yogi Adityanath : अवैध धर्मांतराच्या विरोधात कायदा पुरेसा नाही, तर हिंदूंनीही भूमिका बजावावी !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे महत्त्वपूर्ण विधान !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी उत्तरप्रदेश शासनाने वर्ष २०२० मध्ये कठोर कायदा केला. केवळ कायद्याद्वारे हा प्रश्न पूर्णपणे सुटू शकत नाही. लोकांना त्यांचे अधिकार, कायदेशीर प्रावधाने आणि सामाजिक उत्तरदायित्व यांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. एक जागरूक समाज संशयास्पद हालचालींना वेळीच रोखू शकतो. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे केवळ सरकारनेच नव्हे, तर (हिंदु) समाजानेही आपली भूमिका बजावली पाहिजे, असे महत्त्वपूर्ण विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवैध धर्मांतराच्या घटनांसंदर्भात येथे आयोजित एका कार्यक्रमात केले.

मुख्यमंत्र्यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. जेव्हा धर्मांतरासारख्या एखाद्या विषयाचे दूरगामी सामाजिक परिणाम होतात, तेव्हा वेळेवर संवाद आणि जनजागृती आवश्यक ठरते. उत्तरप्रदेश सरकारने कायदा आणि जनजागृती या दोन्ही गोष्टींवर समान लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

२. इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे की, प्रत्येक युगात समाजात गोंधळ, फूट किंवा असंतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या शक्तींचा उदय झाला आहे. जर समाज एकजूट आणि जागरूक राहिला, तर कोणत्याही नकारात्मक कृतीला यशस्वी होण्याची संधी मिळणार नाही. सामाजिक एकता आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ झाली पाहिजे.

३. महिलांचा सन्मान आणि सुरक्षा हे भारतीय संस्कृतीचे नेहमीच केंद्रस्थान राहिले आहे. त्यामुळे फसवणूक, बळजबरी किंवा प्रलोभन यांद्वारे एखाद्या व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि ओळख (धर्म) धोक्यात आणण्याच्या कोणत्याही प्रयत्नाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे.

४. सार्वजनिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या भूमींचे संरक्षण करणे ही प्रशासन अन् समाज या दोघांचेही दायित्व आहे. कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर नियंत्रण किंवा अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. राज्य सरकार यासंदर्भात सातत्याने कारवाई करत आहे. भूमीशी संबंधित वाद ही केवळ कायदेशीर सूत्रे नसून त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूही असतात. त्यामुळे अशी प्रकरणे हाताळतांना संवेदनशीलता आणि सतर्कता या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.

५. भारताची ओळख ही येथील संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक वारशातून निर्माण झाली आहे. जर समाज आपल्या मुळांशी जोडलेला राहिला, तर तो कोणत्याही आव्हानाचा धैर्याने सामना करण्यास अधिक सक्षम असेल. विशेषतः तरुणांनी भारतीय इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास अन् आकलन केले पाहिजे.