पांगरे येथे दरीत झुकलेली चारचाकी रानवेलींत अडकल्याने ७ भाविकांचे वाचले प्राण

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रचीती देणारी घटना !

राजापूर, २ जून (वार्ता.) – राजापूर तालुक्यातील पांगरे येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेत ७ भाविकांचे प्राण थोडक्यात वाचले. पुणे येथून दर्शनासाठी आलेल्या भाविकांची चारचाकी गाडी ५० फूट खोल दरीत कोसळण्याच्या उंबरठ्यावर असतांना दाट रानवेली आणि झुडपे यांमध्ये अडकून राहिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
पुणे येथील भाविक पांगरे येथील स्वामी शिवानंद टेंबे महाराज मठात दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी समाधीस्थळालाही भेट दिली. सायंकाळी पाचच्या सुमारास पांगरे पुलालगत उभी केलेली चारचाकी चालू करतांना ‘हँडब्रेक’ व्यवस्थित ओढलेला नसल्याने वाहन अचानक मागे सरकू लागले.

वाहनाच्या मागील बाजूस दरी असून त्यामध्ये मोठमोठे दगड आहेत. गाडी घसरत घसरत दरीच्या दिशेने सरकली आणि जवळपास ७५ टक्के भाग दरीत झुकला; मात्र सुदैवाने त्या ठिकाणी असलेल्या दाट झुडपे आणि रानवेली यांमध्ये वाहन अडकून राहिले. प्रसंगावधान राखत ७ भाविकांनी पुढील दरवाजातून बाहेर पडून सुरक्षितता साधली. बाहेर आल्यानंतर समोर दिसणारे दृश्य पाहून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. वाहनाने एक जरी पलटी घेतली असती, तर ते थेट दरीत कोसळून भीषण अपघात घडण्याची शक्यता होती. देवाच्या आणि स्वामींच्या कृपेमुळेच वाचल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.