Bengal Border Fencing : बंगालमध्ये सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल पोचल्यावर गावकर्‍यांनी वाटली मिठाई !

कोलकाता (बंगाल) – बंगाल सीमेचा ६०० किलोमीटरचा एक भाग असा आहे, जिथे बांगलादेशासमवेतची सीमा पूर्णपणे उघडी आहे. तेथे कोणतेही कुंपण नाही.  मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जलंगी बाजारात शून्य रेषेवर वसलेले सकारपाडा गावात काही दिवसांपूर्वी जेव्हा सीमा सुरक्षा दलाचे पथक सीमा मोजण्यासाठी पोचले, तेव्हा गावकर्‍यांनी  मिठाई वाटली.

१. या गावाची लोकसंख्या ४ सहस्र असून २ सहस्र ५०० मतदार आहेत. यांपैकी ९५ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. गावाचे भौगोलिक स्थान अत्यंत संवेदनशील आहे. घरे संपताच लोकांचे शेत असून शेत संपताच बांगलादेश चालू होतो.

२. स्थानिक रहिवासी पिंटू मंडल यांनी सांगितले की, आम्हाला संध्याकाळी ५ वाजेनंतर आमच्या शेतात जाण्याची अनुमती नाही; पण बांगलादेशाचे लोक कधीही आमच्या शेतात घुसतात आणि पिके कापून घेऊन जातात. गेल्या ३० वर्षांत असा एकही महिना गेला नाही की, त्यांच्याशी वाद झाला नाही; पण आता असे होणार नाही; कारण सीमा सुरक्षा दलाने कुंपण घालणे चालू केले आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, रात्री जसे पीक सोडू, सकाळी तसेच मिळेल.

बांगलादेशाला लागून आहे बंगालची २ सहस्र २१६ कि.मी. सीमा

भारत आणि बांगलादेश यांच्यात ४ सहस्र ९७ किलोमीटर लांबीची सीमा लागून आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मते, अनुमाने ३ सहस्र २४० किलोमीटर सीमेवर कुंपण घालण्यात आले असून अनुमाने ८५० किलोमीटर, ज्यात १७५ किलोमीटरचा दुर्गम भूभागाचही समावेश आहे, तेथे कुंपण घालणे शेष आहे.